पुणे: बेकायदा मार्गाने भारतात प्रवेश करून पुण्यात वास्तव्य करणार्या 16 बांग्लादेशी नागरिकांना मंगळवारी (दि. 22) त्यांच्या देशात पाठवून देण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामध्ये 15 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
15 महिलांना पुणे विमानतळावरून, तर एका पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुणे शहर पोलिसांनी 16 जुलैपासून बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. (Latest Pune News)
बुधवार पेठ, शुक्रवार पेठ आणि आंबेगावमधून 16 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील महिलांना मुंढवा येथील शासकीय महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांना कायदेशीररित्या भारतातून त्याच्या देशात पाठविले जाणार आहे.
या कारवाईत पुणे पोलिस दलाची विशेष शाखा, गुन्हे शाखेची दोन पथके, पाच परिमंडळांची पाच पथके आणि स्थानिक पोलिस ठाण्यांची तपास पथके सहभागी झाली होती. ताब्यात घेतलेल्या 16 बांग्लादेशी नागरिकांपैकी 15 महिला असून, त्यातील अनेक महिला वेश्याव्यवसायात होत्या आणि त्यांना फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेला पुरुष बांग्लादेशी मजूर म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
...असे दिले जाणार त्यांना पाठवून?
पोलिस दलाच्या विशेष शाखेकडून या बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या देशात (डिपोर्ट) पाठवून देण्याबाबत राज्य शासनाला कळवले जाते. राज्य शासनाकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवले जाते. गृहमंत्रालयाकडून संबंधित नागरिक बांग्लादेशी असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या समन्वयाने विमानाने या बांग्लादेशींना कोलकाता येथे नेण्यात येते.
पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बांग्लादेशात पाठविले जाते. शहरात अवैधपणे राहणार्या बांगलादेशी नागरिकांविरूद्ध यापूर्वीही डीपोर्टेशनची कारवाई करण्यात आली आहे. 2020 ते 2024 या पाच वर्षांत केवळ आठ बांग्लादेशी नागरिकांना डिपोर्ट करण्यात आले आहे. 2025 मध्ये यापूर्वी एका बांग्लादेशी नागरिकाला डिपोर्ट करण्यात आले असून मंगळवारी 16 बांग्लादेशी नागरिकांच्या तुकडीला मायदेशी धाडले जाणार आहे.
मंगळवारी 16 बांग्लादेशी नागरिकांची पहिली तुकडी डिपोर्ट करण्यात येणार आहे. तसेच, 2025 मध्ये एकूण 15 बांग्लादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ पुरुष आणि सात महिला आहेत. या नागरिकांविरुद्ध न्यायालयात खटले सुरू आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही भारतातून डिपोर्ट केले जाईल.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त