विक्रमगड ः हवामानाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत असून आंबा बागायतदार धास्तावले आहेत. एकीकडे वाढती उष्णता तर अचानक होणारे ढगाळ वातावरण हे आंबापिकासाठी धोकादायक ठरत असून पिक नुकसानीच्या भिती व्यक्त होत आहे.
विक्रमगड तालुक्यात यंदा हवामानाच्या लहरीपणाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे प्रचंड उष्णतेचा तडाखा, तर दुसरीकडे अचानक निर्माण होणारे ढगाळ वातावरण या दुहेरी संकटामुळे आंबा बागायतींना जबर फटका बसत आहे. हंगामाच्या सुरुवातीला भरघोस मोहर आल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण होते. मात्र, त्यानंतरच्या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मोहर गळणे, फुलांचे नुकसान आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे परिस्थिती बिघडली आहे.
परिणामी, यंदा आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि रात्री वाढणारी आर्द्रता यामुळे झाडांवर ताण निर्माण होत असून फळधारणा कमी होत आहे. यामुळे केवळ उत्पादनच नाही तर फळांची गुणवत्ता देखील घसरत असल्याने बाजारभावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी संकटात टाकणारी ठरत आहे.
“यंदा उत्पादन निम्म्यावर येईल” अशी भीती अनेक बागायतदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात असले तरी प्रत्यक्षात हवामानाच्या अनियमिततेसमोर त्या अपुऱ्या ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हवामानाचा अनियमित खेळ आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे विक्रमगड तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.