वाडा: सार्वजनिक बांधकाम विभागाचा अखत्यारित येणाऱ्या वाडा तालुक्यातील सर्व रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण असून यामुळे तालुक्यातील दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गाचे काँक्रीटीकरण एकीकडे संथगतीने सुरू असताना दुसरीकडे पर्यायी रस्त्यांची देखील अवस्था दयनीय झाली आहे.
शिरीषपाडा ते कांबारे हा ठाणे व कल्याणकडे जाण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग खड्ड्यांनी भरला असून पावसाळ्यात या भीषण परिस्थितीचा सामना जनतेला करावा लागणार आहे.
शिरीषपाडा ते कोने या पट्ट्यात नुकताच एका नामांकित कंत्राटदाराने काँक्रिटीकरण केले असून सरकारने यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. ठेकेदाराची मनमानी व अधिकाऱ्यांची त्याकडे झालेली डोळेझाक यामुळे काँक्रिटीकरणाचा अल्पावधीतच पार बट्ट्याबोळ झाला आहे. नव्याने बनवण्यात आलेल्या रस्त्याला जागोजागी तडे गेले असून दोन रस्त्यांच्या मध्ये प्रचंड मोठी भेग गेल्याने वाहन चालकांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
कांबारे या गावापर्यंत रस्त्यावर बेसुमार खड्डे पडले असून हे खड्डे भरण्यासाठी उन्हाळ्यात एका कंत्राटदाराची नेमणूक देखील करण्यात आली होती. खडीचा पहिला थर कंत्राटदाराने कसातरी अंथरला मात्र वरील थर टाकण्याबाबत कंत्राटदाराने एक्झिट घेतल्याचे दिसत आहे.
खड्डे भरण्यासाठी मंजूर झालेला लाखो रुपयांचा निधी देखील मार्च अखेरीस काढून गिळंकृत केल्याचा संशय लोकांनी व्यक्त केला असून सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळामध्ये जनता भरडली जात आहे. उप अभियंता संजय डोंगरे यांना संपर्क केला की ते कधीही प्रतिसाद देत नसून डोंगरे यांना जाब विचारणारा कुणी वरिष्ठ अधिकारी आहे की नाही असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.
उपोषणाचा इशारा
मनोर-वाडा-भिवंडी मार्गावरील अपूर्ण कामामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात यासह वाडा तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते जयेश शेलार यांनी 15 जून पासून उपोषणाचा इशारा दिला आहे.