सचिन भोईर
विक्रमगड: माणूस एकीकडे चंद्रावर पोहोचला असला तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांना आजही हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागत आहे. विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे ग्रामपंचायत हद्दीतील चुन्याचा पाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पहाटेपासून रात्र होईपर्यंत पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
डहाणू-जव्हार मार्गावरील हा परिसर पावसाळ्यात निसर्गसंपन्न आणि हिरवागार दिसत असला तरी उन्हाळ्यात येथील वास्तव अत्यंत विदारक बनते. चुन्याचा पाडा येथील सुमारे 130 घरांच्या लोकवस्तीसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.
गावातील पाच ते सहा बोअरवेल पाण्याअभावी निकामी झाल्या असून विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी एका विहिरीतील कळशीभर पाण्यासाठी महिलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. गावातील महिलांचे जीवन अक्षरशः पाण्याभोवतीच फिरत आहे.
घरकाम, शेती, रोजगार आणि मुलांची जबाबदारी सांभाळायची की दिवसभर पाणी भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. “वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे. उन्हाळा आला की पाण्यासाठी संघर्ष सुरू होतो,“ अशी खंत स्थानिक महिला वसूला घाटाळ यांनी व्यक्त केली.
उन्हाळी सुट्टीत इतर मुले विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना येथील विद्यार्थिनींना मात्र डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकावे लागत आहे. “आमच्या डोक्यावरचा हंडा काही उतरायचे नाव घेत नाही,“ अशी वेदना विद्यार्थिनी वैशाली कोती व तिच्या मैत्रिणींनी व्यक्त केली.
नजिकच्या माडाच्यापाडा गावातही अशीच परिस्थिती असून जलजीवन मिशन योजनेचा अपेक्षित लाभ अद्याप नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे गावात तातडीने टँकर सुरू करावा तसेच पेसा निधीतून लघु पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सरपंच दिलीप कोकेरा यांनी सांगितले की, गावात काही बोअरवेल असून भविष्यात जलजीवन योजना कार्यान्वित होईल. मात्र सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
टँकरची प्रतीक्षा; प्रशासनाकडे आशेने पाहणारे ग्रामस्थ
तहानलेल्या गावकऱ्यांना आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली महिलांची ही रोजची जीवघेणी धडपड थांबवण्यासाठी त्वरित टँकर सुरू करावा आणि कायमस्वरूपी जलस्रोत उभारावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.