बाजारपेठेअभावी विक्रमगडमधील शेतकरी चिंतातुर  pudhari photo
पालघर

Vikramgad market shortage : बाजारपेठेअभावी विक्रमगडमधील शेतकरी चिंतातुर

भातपिकाला हमी भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विक्रमगड ः विक्रमगड तालुक्यातील 94 गाव-पाडयांतुन 7858 हेक्टर क्षेत्रावर मोठया प्रमाणात भातशेती केली जाते. विक्रमगड तालुका गावठी तांदळाच्या वाणा करीता परीचित असून भात हेच येथील आदिवासी शेतक-यांचे मुख्य उपजिवीकेचे साधन आहे. त्यामुळे येथे भात पिक मोठया प्रमाणात घेतले जात असुन सध्यस्थितीत पिकविलेले भातपिकाची विक्री बाजारात शेतकरी करुन त्यामधुन मिळणा-या पैशातुन व उर्वरीत घरात खाण्याकरीता ठेवलेले भात असे त्यांचे वर्षभराचे उदरनिर्वाचे गणीत असते.

परंतु विक्रमगड येथे भातपिक खरेदी करीता मोठी व योग्य अशी बाजारपेठ नसल्याने बाजारपेठे अभावी शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. त्यातच शासनाने अजुनही भात खरेदी केंद्रे सुरु केली नाहीत, त्यामुळे उत्पादीत भातविकाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाकडुन ही भात खरेदी केंद्रेही सुरु करुन शेतक-यांच्या उत्पादीत भातपिकाला योग्य असा हमी भाव दयावा अशी मागणी जोर धरत आहे. व या बाबतचे मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी यांनी शासना कडे केली आहे.

राज्यात होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असले तरी शेतक-यांनी काबाड कष्ट करुन शेतात पिकविलेल्या भातपिकाला मात्र योग्य हमीभाव न मिळाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने आत्महत्या सारखे प्रकार घडत आहेत. आज महागाई येवढी वाढली आहे की, त्यामध्ये शेती करणे दिवसेदिवस मोठे जिकरीचे होत आहे. व त्यात उत्पादीत केलेला माल विक्री करुन काही मिळत नसेल तर तो शेतकरी काय करणार असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात 7858 हेक्टर क्षेत्रावर शेतकरी महागडया वेगवेगळया भात वाणांची हळवार, गरवार व निमगरवार अशा पध्दतीत लागवड करीत असून शेतीवरच अवलंबुन असल्याने अवेळी पडणारा पाऊस, वाढती मजुरी, खतांची बियांनाची भाववाढ पिकांवर येणारा रोग या अडचणीतुन हाती आलेले पिक विकुन शेतकरी आपले जीवन जगतात. परंतु आता उत्पादित भात पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी संघर्श करण्याची वेळ शेतक-यांवर येवुन ठेपली आहे.

शेतकरी हवालदिल

दोन-चार वर्षा पासुन शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीवर शेतक-यांनी अफाट खर्च करुन भातपिक तयार केले आहे. त्यालाही हमी भाव नाही त्यात वाढती मजुरी,खत-बि-बीयाणे यांची वाढती किंमत शेती साहित्यामध्ये सततची होणारी भाववाढ या सगळयांची भरपाई शेतक-यांना कर्ज काढुन भात शेतीला लावले आहे. भातपिक विकुन या कर्जाची परतफेड त्यांना करावयाची आहे. त्यामुळे भातपिकाला शासनाने योग्य हमी भाव देणे गरजेचे आहे. परंतु अद्याप ना चांगला हमीभाव व ना भात खरेदी केंद्र सुरु करण्यावर हालचाली. त्यामुळे चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

निसर्गाचा लहरीपणा, वाढती महागाई, पिकांवर येणारा रोग त्यामुळे शेती पिकवणे कष्टाचे झाले असून. केलेला खर्चही वसुल होत नाही. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत चाललेला आहे. त्यामुळे उत्पादीत केलेल्या मालाला योग्य हमी भाव व योग्य अशी बाजारपेठ असणे आवष्यक आहे. व शासनाने शेतक-यांच्या उत्पादीत मालाच्या खरेदी करीता भात खरेदी केंद्रे चालु करुन दिलासा द्यावा.
घनश्याम आळशी, तालुका अध्यक्ष, काँग्रेस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT