विरार: वाढत्या जलकर थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या वसई-विरार महानगरपालिकेने अखेर थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलत व्यापक कारवाई सुरू केली आहे. 31 मार्च अखेरपर्यंत तब्बल 300 पेक्षा अधिक पाणी कनेक्शन तोडण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे मनपाने 69.4 कोटी रुपयांची मोठी वसुली करण्यात यश मिळवले आहे.
महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागामार्फत शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केला जातो. पेल्हार, उसगाव, सूर्या योजना फेज-2 व फेज-3 तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून सध्या शहराला सुमारे 35 कोटी लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या, नव्या बांधकामांची वाढ आणि पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभालीवरील वाढता खर्च यामुळे या व्यवस्थेवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
शहरात सुमारे 67 हजार पाणी कनेक्शन असून, याच माध्यमातून मनपाला जलकराच्या स्वरूपात महसूल मिळतो. परंतु अनेक ग्राहकांकडून नियमित कर भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी साचली आहे. वारंवार सूचना देऊनही संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मनपाने कठोर भूमिका घेत थेट कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.
या विशेष मोहिमेअंतर्गत मार्च अखेरपर्यंत 300 हून अधिक कनेक्शन तोडण्यात आले असून, पुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ज्या नागरिकांनी थकबाकी रक्कम आणि नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क भरले आहे, त्यांचे पाणी कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरण्यास सुरुवात केली आहे.
मनपाने नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन करताना स्पष्ट केले आहे की, थकबाकी न भरल्यास पुढील काळात अधिक कडक कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान थकबाकीबाबत पालिकेकडून वारंवार सूचना करूनही ग्राहकांकडून दुर्लक्ष केले जाते. याचाच परिणाम म्हणून ाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभालीवरील वाढता खर्च यामुळे या व्यवस्थेवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.त्यामुळे वसई-विरार पालिकेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.