नालासोपारा : आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त जलसंपदा मंत्री व भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले.यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करत असताना “वसई विरार महापालिकेचे आव्हान जरी आपल्यासमोर असले तरी भारतीय जनता पार्टीने या भागात असणारी गुंडगिरी काही स्वरूपात संपवली आहे आणि येत्या निवडणुकीत आपल्याला त्याचं पानिपत करायचा आहे.साफसफाई करायची आहे. देश 1947 साली स्वतंत्र झाला. पण, या शहराला आता स्वातंत्र्य मिळालं आहे”, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी एका पक्षावर निशाना साधला.
नालासोपारातील कानिया हॉल येथे भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित, नालासोपाराचे आमदार राजन नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, महेंद्र पाटील,मनोज बारोट,भूषण किणी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारी योजना, पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची तसेच तरुण मतदार वर्गाला सोबत घेऊन चालण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर आधारित अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यावेळी त्यांनी नमूद केले.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहराला भेट म्हणून दिलेले जगातील सर्वात मोठे बंदर वाढवण बंदर आणि मुंबईहून विरारपर्यंत जाणारा विरार उत्तन सागरी मार्ग हा भाजपमुळे शहराला मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे राहणार आहे. तसेच, निवडणुकांच्या दृष्टीने ‘फर्स्ट टाइम वोटर’ (प्रथमच मतदान करणारे) आणि ‘सेकंड टाइम वोटर’ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या मतदार वर्गाने विधानसभेत परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे यांना सोबत घेऊन चालणे गरजेचे असल्याचे म्हणत तरुण मतदारांचे निवडणुकीच्या दृष्टीने असणारे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक केलेल्या नालासोपारा दौऱ्यामुळे भाजपने वसई विरार महापालिका काबीज करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.