खानिवडे: वसई तालुक्यात बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या या सरींनी प्रवाहित झालेल्या पाण्याने रस्त्यांवर पाणी वाहू लागले तसेच शेत खाचरात पाणी साचले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यांच्या अंदाजाप्रमाणे हा पाऊस कोसळला असला तरी अजूनही केरळात दाखल न झालेल्या मान्सूनच्या अगोदर हा पाऊस कोसळल्याने मान्सूनला सुरवात झाली नसल्याचे स्पष्ट होते आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे पेरण्यांना घाई करू नये. केरळात येत्या तीन चार दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यानंतर साधारण आठवडाभरात महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होतो असा आजवरचा अनुभव आहे.
त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी खरीपांच्या पेरण्यांचे नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.दरम्यान बुधवारी कोसळलेल्या या सरींनी वातावरणात मोठा गारवा नियमन केला .त्यामुळे गेला पंधरवडा आग ओकणाऱ्या सूर्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या वसई कारांना उकाड्यापासून चांगलाच दिलासा दिला.