तानसा पुलाच्या दुरुस्तीसाठी पाच दिवस वाहतूक रोखली pudhari photo
पालघर

Tansa bridge repair work : तानसा पुलाच्या दुरुस्तीसाठी पाच दिवस वाहतूक रोखली

रस्ते प्राधिकरणाकडून पुलाच्या खालील भागाचे दुरुस्तीचे काम हाती

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : गेली 65वर्षे अहोरात्र सेवा देणाऱ्या महामार्गावरील जुन्या तानसा पुलाचे खालील काही भागातील प्लास्टर खडून जाऊन आतील सळ्या दिसू लागल्याने या पुलावरून होणारी अवजड वाहतूक मागील पाच दिवसांपासून रोखण्यात आली होती. मात्र हा खूप मोठा धोका नसल्याने शुक्रवारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच रस्ते प्राधिकरणाकडून पुलाच्या खालील भागाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची पूर्व तयारी सद्ध्या पुलाखालील तानसा खाडीत सुरू आहे.

वसई पूर्वेतून जाणाऱ्या आताच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील तानसा नदीवर असलेल्या तेव्हाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील जुन्या पुलाच्या खालील बांधकामाचे प्लास्टर खडून गेल्याने या पुलाच्या बांधकामाच्या आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. तसेच पुलाच्या गर्डरला तडा गेले आहेत. यामुळे महामार्ग रस्ते प्राधिकरणाकडून या पुलावरून होणारी अवजड वाहतूक काही दिवस बंद करण्यात आली होती. तर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये केवळ दुहेरी वाहतूक असलेला महामार्ग आता सहा पदरी झाला असून जुन्या पुलाला समांतर दोन नवे पूल झाल्याने महामार्गावरील वाहतूक मात्र बिनधोक सुरू आहे.

हा जुना पूल या भागात एक इतिहास निर्माण करणारा ठरला असून गेली 65 वर्षे अहोरात्र सेवा आजही देत आहे. मागील शतकातील 1960 च्या दशकात निर्माण करण्यात आलेल्या या पुलाच्या निर्माणामुळे गुजरात राज्यासह वसईचा तेव्हाचा दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या तानसा खाडी पलीकडील रहिवाशीयांचा वसई तालुका व मुंबई सारख्या शहरांशी संपर्क सहज झाल्याने येथील त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

वसई पूर्वेतून जाणाऱ्या सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील तानसा नदीवर असलेल्या जुन्या तानसा पुलाच्या खालील बाजूचे प्लास्टर कोसळल्याने पुलाच्या बांधकामातील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. तसेच पुलाच्या गर्डरला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती.

या धोकादायक स्थितीची लागलीच दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पुलावरून होणारी अवजड वाहतूक तात्काळ बंद केली होती. मात्र शुक्रवार पासून ती पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. या पुलाच्या दुरुस्ती कामाची तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

1960 च्या दशकात तेव्हाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर एकाच मार्गावरून दुहेरी वाहतुकीच्या या तानसा पुलाची उभारणी करण्यात आली होती. आता या पुलाच्या निर्मितीला 65 वर्षांचा काळ लोटला आहे. दगडी बांधकामांचे आजही मजबूत पिलर असलेल्या या जुन्या पुलामुळे गुजरात राज्यासह उत्तर मध्य भारताचा मुंबईशी संपर्क सुरू झाला होता ही मोठी बाब होती.मात्र याचबरोबर वसई तालुक्याच्या तानसा खाडीपलीकडील, तेव्हा अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागातील रहिवाशांचा वसई, मुंबईसारख्या महानगरांशी संपर्क सुलभ झाला होता.

परिणामी व्यापार, शिक्षण, रोजगार आणि दळणवळणाला चालना मिळून या परिसराच्या विकासाला गती मिळाली होती. मात्र अनेक दशकांच्या वापरानंतर आणि वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे पुलाच्या संरचनेवर परिणाम झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुलाची सखोल तांत्रिक तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई-दिल्ली महामार्गावरील खाड्यांवर, नदी नाल्यांवर अनेक जुने पूल आहेत. ज्यांचा वापर आजही सुरळीत सुरू आहे. मात्र त्यांची मजबुती, सद्य स्थिती पडताळून आवश्यक तेथे त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यातीलच वसईतील तानसा खाडीवरील खानिवडे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
सुहास चिटणीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT