Wild Vegetables Pudhari
पालघर

Wild Vegetables| रानभाज्यांनी वसई बाजार फुलला; विविध प्रकारच्या औषधी गुणधर्मांनी समुद्ध भाज्या दाखल

करटोली, फोडशी, अंबाडी, कुई, बांबूचे कोवळे कोंब आणि इतर अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा: पावसाळा सुरू होताच वसईतील भाजीबाजारात पारंपरिक रानभाज्यांची मोठी आवक झाली असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डोंगरदऱ्या आणि जंगल परिसरातून आदिवासी महिला पहाटेच विविध प्रकारच्या ताज्या रानभाज्या घेऊन बाजारात दाखल होत आहेत.

करटोली, फोडशी, अंबाडी, कुई, बांबूचे कोवळे कोंब आणि इतर अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पावसाळा हा रानभाज्यांचा हंगाम मानला जातो. या काळात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानल्या जातात. त्यामुळे अनेक कुटुंबे या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करत आहेत. विशेषतः मधुमेह, पचनाच्या समस्या, रक्तशुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

वसई परिसरातील बाजारपेठांमध्ये सकाळच्या वेळेतच ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, ताज्या आणि दर्जेदार रानभाज्या मिळाव्यात म्हणून अनेक जण लवकर बाजारात पोहोचत आहेत. काही रानभाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांना मोठी मागणी असून, विक्रीही झपाट्याने होत आहे. या रानभाज्यांच्या विक्रीमुळे आदिवासी महिलांना चांगला आर्थिक आधार मिळत आहे.

जंगलातील नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. पावसाळ्यातील हा हंगाम त्यांच्या दृष्टीने उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरतो. ग्राहकांकडूनही त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले जात असून, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याची भावना वाढताना दिसत आहे.

अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या या रानभाज्या आता शहरातील नागरिकांमध्येही लोकप्रिय होत आहेत. आधुनिक जीवनशैलीमुळे विस्मरणात गेलेल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीकडे नागरिक पुन्हा वळताना दिसत आहेत. नैसर्गिक, रासायनिक खतांपासून मुक्त आणि पौष्टिक असल्याने या भाज्यांना आरोग्यप्रेमी नागरिकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक रानभाजीची ओळख आणि तिचे गुणधर्म समजून घेऊनच तिचा वापर करावा. योग्य प्रकारे स्वच्छ करून शिजविल्यास या भाज्या शरीरासाठी अत्यंत पोषक ठरतात. त्यामुळे पावसाळ्यात वसईच्या बाजारात रानभाज्यांचा सुगंध आणि ग्राहकांची लगबग यामुळे बाजारपेठेला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT