खानिवडे: पालघर जिल्ह्यातील पारंपरिक ओळख असलेला आणि खाण्यात विशिष्ट चवीचा रायवळी आंबा आता बाजारात दाखल झाला असून जिल्ह्यातील प्रमुख नाके, ग्रामीण बाजारपेठा आणि रस्त्यालगतच्या ठिकाणी त्याची विक्री सुरू झाली आहे. आकाराने लहान, कमी मांसल पण रसाने परिपूर्ण असलेल्या या गावठी आंब्याच्या आगमनाची दरवर्षी खास खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात.
पालघर जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात भात पिकासोबतच नैसर्गिकरीत्या आढळणारा रायवळी आंबा हा स्थानिक जैववैविध्याचा महत्त्वाचा भाग मानला जातो. पिकल्यानंतर त्याची आंबट, गोड आणि तुरट अशी एकत्रित चव रसिकांना वेगळी अनुभूती देते. त्यामुळे हा आंबा चोखून खाण्याची खास परंपरा ग्रामीण भागात आजही कायम आहे.
जिल्ह्यातील भागानुसार या आंब्याला वेगवेगळी नावेही आहेत. तुंगारेश्वर परिसरातील आंबा ‘तुंगारी’, तर टकमक गड परिसरातील आंबा ‘टाकी आंबा’ म्हणून ओळखला जातो. मात्र सर्वसामान्यांमध्ये तो ‘गावठी आंबा’ या नावानेच प्रसिद्ध आहे. रायवळी आंब्याची साल पातळ, हिरवट-पिवळी असून गर सुगंधी आणि रसाळ असतो. काही आंब्यांच्या आत रेषा असल्याने ते विशेषतः लोणच्यासाठी वापरले जातात. तसेच आंबोशी, जॅम, पन्हे आणि पारंपरिक पद्धतीने खाऱ्या पाण्यात साठवून ठेवला जाणारा ‘पाण्यातला आंबा’ यांसारखे पदार्थही यापासून तयार केले जातात.
एप्रिल ते जून हा या आंब्याचा मुख्य हंगाम मानला जातो. पालघर जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या आंब्यास पोषक ठरते. विशेष म्हणजे जमिनीवर पडलेल्या बाठ्यांपासून पावसाळ्यात सहज रोपे उगवतात आणि कमी पाण्यातही ही झाडे जोमाने वाढतात.
हापूस, केसरसारख्या व्यावसायिक आंब्यांच्या वाढत्या लागवडीमुळे रायवळीसारख्या पारंपरिक जाती कमी होत असल्या तरी ग्रामीण भागात या आंब्याचे महत्त्व अजूनही टिकून आहे. विशेषतः रानमेवा गोळा करणाऱ्या आदिवासी, कष्टकरी आणि गरीब कुटुंबांसाठी हा आंबा हंगामी रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.