बोईसर: तारापूर एमआयडीसी परिसरात प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,संबधीत कंपनीकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वायू प्रदूषण केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दिवसा प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळल्याचे भासवणाऱ्या काही उद्योगांकडून रात्रीच्या वेळी धूर सोडून पर्यावरणाशी डोंबाऱ्याचा खेळ सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, रात्री उशिरा कंपनीच्या चिमण्यांतून मोठ्या प्रमाणात काळा व दुर्गंधीयुक्त धूर सोडला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, श्वसनाचे विकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी होणारे हे प्रदूषण लक्षात येणे कठीण असल्याने संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. तारापूर एमआयडीसी आधीच देशातील सर्वाधिक प्रदूषणग्रस्त औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जात असताना अशा प्रकारामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अचानक तपासण्या कराव्यात व दोषी आढळणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित कंपनीकडून याबाबत अधिकृत भूमिका समजू शकलेली नसून, प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.