वाडा: कांबारे ते वाशिंद मार्गावर सावरोली गावाजवळील तानसा नदीपूल धोकादायक असल्याने या मार्गावरील वाहतूक चिंतेचा विषय बनलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेली दुरुस्ती कुचकामी असल्याचे लोकांचे म्हणणे असून यामुळे निधीची नासाडी होणार असून पुलाचा धोका जैसे थे राहणार आहे. पुलावरून होणारी अती अवजड वाहतूक रोखण्यात देखील प्रशासनाला अपयश येत आहे.
दोन वर्षांपासून तानसा नदीवरील हा पूल धोकादायक अवस्थेत आढळल्याने पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. काहीच दिवसांत हा नियम मोडीत निघून उलट जास्त प्रमाणात अती अवजड वाहतूक वाढू लागली आहे.
शहापूर येथील पिडब्लूडी विभागाने पुलाची दुरूस्ती हाती घेतली असून जवळपास २८ ते ३० लाखांचा खर्च यासाठी केला जाणार आहे. लोखंडी संरक्षक भिंत, पुलावर काँक्रीटीकरण, खांबांना पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी काँक्रीटीकरण अशी कामे यात केली जाणार आहेत.
कंत्राटदाराने काम हाती घेतले असून सुरू करण्यात आलेले काम कुचकामी असल्याचे स्थानिक सांगतात. काँक्रिटमध्ये आवश्यक केमिकल टाकण्यात आली नाहीत असे निदर्शनास येत असून पहिल्याच पावसात खांबांचे संरक्षण वाहून जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पुलासारख्या जोखमीच्या काँक्रिट व अन्य कामांकडे लक्ष देण्यासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसून यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही अशी भीती स्थानिकांना आहे. पिडब्लूडी अधिकारी कांबळे यांना याबाबत माहिती दिली असता कंत्राटदाराला सूचना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.