पालघर: विवाह सोहळा म्हंटल की अफाट खर्च,तीन ते चार दिवस चालणारे सोहळे अशी जणू स्पर्धाच सध्याच्या काळात पहायला मिळत आहे. मात्र प्रत्येकालाच हे शक्य होते असे नाही. त्यामुळे विशेष विवाह कायद्या अंतर्गत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अनावश्यक खर्चाला फाटा देत विशेष विवाह कायद्या अंतर्गत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जेवणावळी,मानपान आणि अन्य खर्चाला फाटा देत सरत्या आर्थिक वर्षात 793 जोप्यांनी विशेष विवाह कायद्या अंतर्गत नोंदणी पद्धतीने विवाह केला तर फॉर्म 16 अंतर्गत 99 जोडपी विवाहबद्ध झाली.
विवाह शुल्काच्या माध्यमातून दोन लाख 14 हजार 480 रुपये रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली.विशेष विवाह कायद्या अंतर्गत महिन्याला सरासरी 66 जोडपी विवाह बद्ध होत आहेत. शासकीय कार्यालयात निरस वातावरणात पार पडणाऱ्या नोंदणी पद्धतीच्या विवाहाला सोहळ्याचे स्वरूप देण्यासाठी विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांसाठी नोंदणी कार्यालयात विशेष व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
यात वधू वरांसाठी दोन आकर्षक राजा राणी खुर्च्यांसह वधू-वर रंगमंच आणि सेल्फी पॉईट तयार करण्यात आला आहे. पालघर जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय इमारत क्रमांक दोन मध्ये उपनिबंधक कार्यालयात विवाह नोंदणी कार्यालय कार्यरत आहे.
उप निबंधक कार्यालयात जमीन खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीसह विवाह नोंदणी केली जाते. नोंदणीच्या ठिकाणी उभयतांकडून प्रतिज्ञा घेतली जाते. प्रतिज्ञा घेताना त्यांना लग्न केल्याचा अनुभव येत नसल्याने मुद्रांक नोंदणी कार्यालय आवारात रंगमंच आणि सेल्फी पॉईट उभारण्यात आला आहे.