अंबरनाथ : हाजी मलंग की श्री मलंग गड या वादातून शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 1980 च्या दशकात श्री मलंग मुक्ती आंदोलन सुरू केले. आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन पेटत ठेवले. आजही हे आंदोलन सुरू आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला हजारो शिवसैनिकांसह याठिकाणी महाआरती करून हिंदुत्वाचा जागर केला जातो. मात्र आजही या गडावर नागरी सुविधांची वानवा आहे. कुणी आजारी पडले तर औषधाला देखील येथे डॉक्टर उपलब्ध नाही. येथील संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे येथे येणारे भाविक अक्षरशः त्रस्त होतायेत.
मलंगड हा रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरचा गड. मलंगडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारणता 800 मीटर एवढी आहे साधारण 700 वर्षांपूर्वी या भागावर नळ राजाचं वर्चस्व होतं. हाजी अब्दुल रहमान अरबी धर्म प्रचारक येमेन वरून आपल्या अनुयायांसोबत मलंगडाच्या पायथ्याशी आले होते. नळराजाने अब्दुल रहमान यांची सत्वपरीक्षा घेतली. या परीक्षेत ते पास झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचं लग्न हाजी अब्दुल रहमान यांच्यासोबत लावून दिलं. अब्दुल रहमान आणि त्याच्या पत्नीची कबर आजही मलंगगडावर असल्याचे बोलले जाते. मात्र गोरखनाथ पंथाला मानणाऱ्या भाविकांच्या मते येथील समाधी ही मच्छिंद्रनाथांची आहे. येथे मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांचे मंदिर देखील आहे.
पेशवे काळात येथील समाधीची देखरेख व मंदिरांची पूजा करण्याची जबाबदारी कल्याणचे ब्राम्हण काशिनाथ केतकर यांच्यावर होती. आजही येथील पूजेचा मान केतकर कुटुंबियांना दिला जातो. मलंग गडावर पोहचण्यासाठी भाविकांना तीन हजार 600 दगडी पायऱ्या चढून जावे लागत होते. मात्र तब्बल बारा वर्षे रखडलेला फ्युनिक्युलर प्रकल्प मागील महिन्यात सुरू झाला. त्यामुळे गडावर भाविकांची व पर्यटकांची संख्या
आपसुक वाढली. परंतू गडावर गेल्यानंतर भाविकांना येथील साचलेले कचऱ्याचे ढीग, अस्वछता, दुर्गंधी व तुटलेल्या दगडी पायऱ्या, धुळीचे रस्ते, भिक्षेकरी आदींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भाविकांचा पुरता हिरमोड होतो. इतकेच नाही तर 10 वी नंतर शैक्षणिक सुविधा नसल्याने येथील राविवाशी स्थलांतरित होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गडावर आवश्यक सुविधा व स्वछता, आरोग्य सेवा आदींची जबादारी घ्यावी अशी मागणी पुढे येत आहे.