नालासोपारा : नालासोपाराजवळील वसई तालुक्यातील कळंब येथील तुलसी रिसॉर्टमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भिवंडी तालुक्यातील कवाड खुर्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान भाजप सरपंचाच्या पती संदेश गुरव याने मद्याच्या नशेत बेकायदेशीर गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे.
मंगळवारी रात्री भिवंडीहून आलेल्या पर्यटकांचा एक गट तुलसी रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी थांबला होता. पार्टीदरम्यान मद्यधुंद अवस्थेतील संदेश गुरव याने स्वतःजवळील गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने रिसॉर्टसह परिसरात काही काळ घबराट पसरली होती. योगायोगाने त्याचवेळी परिसरात गस्त घालत असलेल्या अर्नाळा सागरी पोलिसांच्या पथकाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रिसॉर्टमध्ये धाव घेत चौकशी सुरू केली. सुरुवातीला उपस्थितांनी गोळीबार झालाच नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना रिकामे काडतूस सापडले. त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता गोळीबार झाल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तातडीने संदेश गुरव याला ताब्यात घेत त्याच्याकडील बेकायदेशीर गावठी पिस्तूल जप्त केले. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेले गावठी पिस्तूल आरोपीकडे कसे आले, ते कोणी पुरवले, त्यामागे शस्त्रांची तस्करी किंवा इतर कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा अर्नाळा सागरी पोलीस सखोल तपास करत आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न 'रामभरोसे'
पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या रिसॉर्टमध्ये भर पार्टीत गोळीबार झाल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पर्यटनस्थळांवरील तपासणी आणि पोलीस गस्त आणखी वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.