सफाळे : विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घामावर पाणी फेरले जात असल्याचे धक्कादायक चित्र सफाळे-विरार दरम्यानच्या नारिंगी जुली बेटावर समोर आले आहे. एका बाजूला खारभूमी विकास विभागामार्फत खारलँड बंधाऱ्याचे काम सुरू असताना, दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनच्या पायलिन कामामुळे शेकडो शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
कार्यकारी अभियंता, खारभूमी विकास विभाग, कळवा (ठाणे) यांच्या मार्फत उभारला जाणारा पाच किलोमीटर खारलँड बंधारा पूर्ण झाल्यास भात शेतीस मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या बंधाऱ्याचे काम सुरू आहे. मात्र त्याच परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या पायलिन कामातून बाहेर पडणारे खारे पाणी थेट भात शेतीत पंपाने सोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी सुमारे 100 एकर क्षेत्र खाऱ्या पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी स्वतःच्या खर्चाने एक ट्रॅक्टर पंप आणि दोन डिझेल पंप लावून पाणी बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आतापर्यंत तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे इंधन खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच लागली आहे.
या संदर्भात बुलेट ट्रेन व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “विकास प्रकल्प आमच्या डोक्यावरून जात आहे, पण आमचे अस्तित्वच पाण्यात बुडवले जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने शेतकरी आता आक्रमक झाले असून पालकमंत्र्यांची तातडीने भेट घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. योग्य ती नुकसानभरपाई आणि तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात होऊ घातलेल्या नव-नविन प्रकल्पांमुळे अनेक जणांच्या शेती जमीनी बाधित झाल्यामुळे विकासाच्या गजरात शेतकऱ्यांचा आक्रोश दबला जाणार का, की प्रशासन जागे होऊन न्याय देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुलेट ट्रेनच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अद्याप कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतीलबाळकृष्ण पाटील, खारभूमी लाभार्थी सहकारी संस्थेचे अध्यक्ष