RTE Admission Pudhari
पालघर

RTE Admission: पालघरात आरचटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ; उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांचे प्रमाण घटले

1 किलोमीटरची अट रद्द होऊनही प्रतिसाद अल्प

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर: आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी राबविल्या जाणाऱ्या शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेची मुदत आता संपली आहे.

पालघर जिल्ह्यात यंदा 5 हजार 685 जागांसाठी 5 हजार 389 अर्ज प्राप्त झाले आहेत. उच्च न्यायालयाने 1 किलोमीटरची जाचक अट रद्द केल्यानंतर अर्जांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असली, तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पालघरमधील पालकांचा प्रतिसाद यंदा कमी भरला आहे.

पालघर जिल्ह्यात मागील वर्षी 5 हजार 142 जागांसाठी 5 हजार 136 अर्ज आले होते, जे जवळपास 100 टक्के होते. यंदा जागांची संख्या वाढून ती 5,685 झाली असली, तरी अर्जांची संख्या 5,389 म्हणजे 95 टक्क्यांवरच वरच थांबली आहे. म्हणजेच उपलब्ध जागांपेक्षाही अर्जांची संख्या कमी आहे. याउलट पुणे, नागपूर आणि ठाणे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध जागांच्या तुलनेत 3 ते 4 पट अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

पालघर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला आणि आदिवासी बहुल आहे. येथे प्रतिसाद कमी मिळण्यामागे विविध कारणे समोर येत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात आरटीई प्रक्रियेबाबत अजूनही पुरेशी माहिती पोहोचलेली नाही.

राज्य शासनाने सुरुवातीला 1 किलोमीटर अंतराच्या शाळेची अट घातली होती. यामुळे पालघरमधील पालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. शहरी भागात तांत्रिक कारणांमुळे शाळा दिसत नव्हत्या, तर ग्रामीण भागात या परिघात शाळाच उपलब्ध नव्हत्या.

न्यायालयाने ही अट रद्द केल्यानंतर 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले, ज्यामुळे शेवटच्या काही दिवसांत अर्जांची संख्या वाढली. मात्र, तोपर्यंत अनेक पालकांनी प्रवेशाची आशा सोडून दिली होती. आरटीई अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. संपूर्ण राज्याची आकडेवारी संकलित झाली असून, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राशी चर्चा करून लवकरच ऑनलाईन सोडतीचे (लॉटरी) वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

कागदपत्रांची अडचण जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यांसारख्या कागदपत्रांची पूर्तता वेळेत न होणे. ऑनलाईन प्रक्रियेचे अज्ञान दुर्गम भागात इंटरनेट आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत पालकांमध्ये अनास्था दिसून येते. पालघरमध्ये जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारत असल्याने अनेक पालक खाजगी शाळांऐवजी सरकारी शाळांना पसंती देत आहेत, असे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT