पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतात कारण की चालू असलेले जिल्हा रुग्णालयाचे काम याशिवाय सुरू असलेले ट्रॉमा केअर सेंटरचे काम ह्या इमारती पूर्ण होऊनही त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधेसह रुग्णसेवा मिळणार आहे का? हा ही सवाल असतानाच या बाबतच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला खुलासा म्हणून आरोग्य यंत्रणे कडून अनेक दावे करण्यात येतात. मात्र आता जिल्ह्यातील एकापाठोपाठ एक अशा दोन घटना घडल्यानंतर तर आरोग्य सेवेचे अक्षरशा धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर जो भीषण अपघात झाला त्यामध्ये जवळपास 13 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. मात्र हा जीव जाण्या अगोदर यातील अनेक जणांना आणि त्यांच्या सोबतच 20 ते 25 जण जखमी झालेल्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी आल्या.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका देखील उपलब्ध होऊ शकल्या नाही. यामुळे अनेक जखमी रुग्णांना उपचारासाठी पिकअप,ट्रक अशा खाजगी वाहनांचा उपयोग करावा लागला. ही घटना ताजी असतानाच मोखाडा तालुक्यात देखील असाच प्रसंग ओढावला.
मोटार सायकलच्या अपघातात चार व्यक्ती गंभीर जखमी झाले. यानंतर उपस्थितांनी रुग्णवाहिके साठी संपर्क केला तर अपघात स्थळी रुग्णवाहिका पोचल्याच नाही या रुग्णवाहिकांची वाट पाहून मग खाजगी वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत नेण्यासाठी ची धडपड सुरू झाली. यात एका जखमीने आपला जीव सोडला तर उपचारासाठी दीड ते दोन तास वाट पाहणाऱ्या दुसऱ्या जखमी ने देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात आपला श्वास सोडला.
मुळात पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आज पालघर जिल्हा स्वतंत्र होऊन बारा वर्षाहून अधिक काळ होऊनही सक्षम झालेली नसल्याचे चित्र आहे. कारण की आजही मोठ्या आजारांसाठी जिल्हा बाहेर स्थलांतर करावे लागत असल्याचे भयान वास्तव आहे. याबाबतचा स्थानिक प्रशासनाकडून मंत्रालय पर्यंतचा पाठपुरावा सुरू आहेच मात्र एखाद्या अपघातात किंवा एखाद्या आरोग्याच्या बिकट परिस्थितीत रुग्णाला किमान प्राथमिक उपचार मिळवण्यासाठी जर वेळेत रुग्णवाहिकाच मिळणार नसतील तर मग त्यावरील उपचाराच्या गोष्टी दिवा स्वप्न ठरणार नाही का.
एखाद्या अपघातात किंवा जव्हार मोखाड्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता आढळलेल्या नडलेल्या गरोदर माता अशा अनेक प्रसंगात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे एखाद्या निष्पाप जीवाला आपला जीव गमावा लागल्याची अनेक उदाहरणे याआधी देखील घडलेली आहेत. आणि आता देखील याची ताजी उदाहरणे आहेत.
या ठिकाणी अधोरेखित करावा असा मुद्दा म्हणजे पालघर जिल्ह्यात अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठमोठे प्रकल्प होत आहेत यासाठी अब्जो रुपये शासन खर्च करत आहे. मात्र नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी साध्या मुबलक रुग्णवाहिका ही जर उपलब्ध होणार नसतील तर हे नेमक्या कोणत्या विकासाचे द्योतक आहे याचे उत्तर सरकारने देणे अपेक्षित आहे.
आज मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील उपलब्ध रुग्णवाहिका आणि सध्या चालू असलेली रुग्णवाहिका यांची आकडेवारी घेतल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे दिसून येईल अशीच परिस्थिती प्रत्येक तालुक्यात पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून येईल. धानीवरी नंतर मोखाड्यात घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी अशीच आहे.
रुग्णवाहतुकीशिवाय रुग्णवाहिकेचा वापर थांबवा
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील की प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात रुग्णवाहिका दिलेले आहेत.रुग्णवाहिका ही अतिशय आपत्ती काळात रुग्णांसाठी वापरणे गरजेचे असते. मात्र जवळपास सर्वच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका या कधी औषधे आणण्यासाठी तर कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध बैठकांसाठी तालुका मुख्यालयापर्यंत सोडण्यासाठी देखील याचा वापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
याशिवाय मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची वाहतूक देखील याच रुग्णवाहिका मधून होते असेही चित्र आहे. यामुळे रुग्णवाहिका रुग्णांसाठी आहे की वैद्यकीय अधिकारी आणि औषधांची वाहतूक करण्यासाठी आहे याचा देखील तपास होणे आवश्यक आहे. कारण की अशा वेळी जर एखादा रुग्ण अत्यवस्थेमध्ये असल्यास आणि कोणतीच रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास रुग्णवाहिके अभावी गेलेल्या जीवाचे मोल कोण ठरवेल हा देखील प्रश्न आहे.