मच्छिंद्र आगिवले
वाडा: कंत्राटदारांचे खिसे गरम करण्यासाठी वाडा नगरपंचायत हद्दीत नाले व ओहोळांवर संरक्षक भिंती उभारून नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्याचे काम राजरोस सुरू आहे.
तालुक्यातील नद्या व ओहोळांवर देखील व्यवसायिक व फार्महाऊस मालक अशीच कामे करीत असून किरकोळ वाटणाऱ्या याच गोष्टी भविष्यातील महासंकटाचे कारण बनण्याची शक्यता आहे असे अभ्यासक सांगतात. नगरपंचायत प्रशासनासह महसूल विभाग सर्व प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
वाडा शहरात झालेल्या विकासकामांमध्ये संरक्षक भिंतींचा मोठा वाटा असून जणू वाडा शहर डोंगरावर वसलेले एखादे हिल स्टेशन आहे असे संरक्षक भिंती बघता वाटते. कादिवली रोड, तळ्याचापाडा, कवठेपाडा, पंपहाऊस रोड, सोनारपाडा व सिद्धेश्वरीरोड भागात संरक्षक भिंतींचे जाळे असून सिद्धेश्वरीरोड भागात एक ओहोळावर तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून लांब भिंत बांधण्यात आली आहे.
ऐनशेत रोड वरील ओहोळाला अडथळा निर्माण करणारी भिंत ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून रद्द केली मात्र तरीही शहरात जागोजागी अशा भिंतींचे जाळे बघायला मिळते. वाडा तालुक्यात गागाई, पिंजाळ, वैतरणा, तानसा व देहर्जे अशा पाच नद्यांचे जाळे असून नद्यांच्या किनाऱ्यांवर व्यवसायिकांनी जागोजागी अडथळे निर्माण करून सुशोभीकरणाची कामे केली आहेत.
पावसाळ्यात सर्व नद्या डोंगराचे पाणी समुद्राकडे घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका बजावत असून ओहोळ व नाल्यांचा यात समावेश मोलाचा आहे.येथील नद्यांसह ओहोळ व नाल्यांवर भिंती बांधून करण्यात येणारे अवैध सुशोभीकरण त्यांचा नैसर्गिक प्रवाहात बाधा निर्माण केल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
ब्राह्मणगाव, खुटल, वाडा, गांधरे, अब्जा, पिंपळास, खरीवली अशा अनेक ठिकाणी नद्यांच्या किनाऱ्यावर बांधकामे करण्यात आली आहेत.