पालघर शहर : पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात बदल होणार असन तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्ण व दमट वातावरण राहील. 3 आणि 4 मार्चनंतर तापमानात अधिक वाढ होऊन कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात 5 ते 11 मार्च दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त, तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, उन्हाळी पिके आणि रोपवाटिकांमधील बाष्पीभवनाचा वेग वाढणार असून, पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान सकाळी जास्त आर्द्रता आणि दुपारी वाढणारे तापमान यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊ शकतो.
भात पिकाची पुनर्लागवड होऊन 20-25 दिवस झाले असल्यास बेणणी करून घ्यावी आणि पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंमीपर्यंत मर्यादित ठेवावी. भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तण विरहित ठेवावे. आंबा आणि काजू: उष्णतेमुळे आंबा आणि काजूची फळगळ होण्याची शक्यता आहे. झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसांतून एकदा पाणी द्यावे. आंबा फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक फळमाशी सापळा एकरी 2 या प्रमाणात लावावा. काजू कलमांच्या आळ्यात पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. चिकू बागेत तण व्यवस्थापन करून आच्छादनाचा वापर करावा.
केळीच्या बागेत हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. भाजीपाला व फुलशेती: मिरची, टोमॅटो आणि वांगी पिकावर तुडतुडे व फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. मोगरा आणि सोनचाफा बागेला गरजेनुसार नियमित पाणी द्यावे. असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल मार्तफतजिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल पालघरमार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.