

बोईसर : संदीप जाधव
तारापूर औद्योगिक वसाहतीतील डी-झोनमधील भगेरिया केमिकल्स कंपनीत सोमवारी दुपारी ओलियम वायूची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी दोन ते सव्वादोनच्या सुमारास ही गळती सुरू झाल्याची प्राथमिक माहिती असून, वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने वायूचा परिणाम आसपासच्या उद्योगांपर्यंत आणि रहिवासी भागात जाणवू लागला.
ओलियम हवेच्या संपर्कात आल्यावर सल्फर डायऑक्साइड व इतर सल्फरस ऑक्साईड्सची निर्मिती होते. या वायूमुळे डोळ्यांची चुरचुर, डोळे लाल होणे, घशात कोरडेपणा व खवखव अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात. सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात वायूचा परिणाम जाणवल्याची माहिती समोर येत आहे. कॅमलिन नाका ते टाकी नाका दरम्यानच्या भागातील उद्योग व रहिवासी परिसराला त्याचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आपत्कालीन कक्षासह महसूल व इतर संबंधित यंत्रणांना तत्काळ सतर्क केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कंपनीकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ओलियम गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ओलियमचा साठा बाधित झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कामगारांची एकच पळापळ सुरू झाली असून संपूर्ण परिसरात पांढऱ्या धुक्याची चादर पसरल्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले. टाकी नाका परिसरातील तारापूर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून घरी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच इतर आस्थापनांतील कामगारांनाही सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, काही बाधित व्यक्तींना बोईसर पूर्वेकडील अधिकारी लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वीही शिवाजीनगर भागात सल्फ्युरिक ऍसिड व ओलियम गळतीची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असून संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे आरोप केले जात आहेत.