पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान उड्डाणपुलाच्या पश्चिमे कडील टाकवहाल येथील बंद दगड खाणीत बुडालेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह स्पीड बोट आणि पाणबूड्याच्या साहाय्याने शोधण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. सकाळी अकरा वाजल्या पासून सुरु असलेली शोध मोहीम सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत आयुष पवार याचा मृतदेह शोधल्यानंतर पूर्ण झाली. शुक्रवारी दुपारी खाणीतील पाणी बाटलीत भरताना दोन अल्पवयीन मुलं पाय घसरून खाणीतील पाण्यात पडून बुडाली होती. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दगड उतखनन करून खाण धोकादायक स्थितीत बेवारसपणे सोडून दिल्याने निष्पापांचे बळी जात असल्यामुळे दगड खाण मालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
मध्य प्रदेशातील इंदोर येथून मस्तान नाका भागात आलेल्या भटक्या कुटुंबातील तीन मुलं शुक्रवारी दुपारी टाकवहाल येथील बंद पडलेल्या खाणीत पाणी आणण्यासाठी गेली होती. खाणीतून पाणी भरताना पाय घसरून खाणीतील पाण्यात पडल्याने दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांकडून शोध कार्य सुरु करण्यात आले होते. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. जिग्नेश विजय पवार, (8)याचा मृतदेह वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधून काढला,परंतु आयुष मुकेश पवार, (15)याचा मृतदेह शोधण्यात वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला अपयश आले होते.
शनिवारच्या दिवशी महापालिकेच्या अग्निशमन दलाला मृतदेहाचा शोध घेण्यात अपयश आल्याने महसूल प्रशासनाकडून एनडीआरएफ दलाला पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकातील जवानांकडून खाणीतील पाण्यात स्पीड बोटच्या साहाय्याने शोधकार्य सुरु केले होते.शोध मोहीम सुरु असताना सायंकाळच्या सुमारास आयुष पवार याचा मृतदेह एनडीआरएफच्या जवानांच्या हाती लागला.पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. टाकवहाल येथील दगड खाणीला कुंपण घालण्यासह जीवितहानी रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवण्यासाठी जागा मालकाला नोटीस बजावण्यात येईल.
आतापर्यंत आठ ते दहा जणांचा टाकवहाल येथील बंद दगड खाणीतील साचलेले पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दगड खाण धोकादायक स्थितीत बेवारसपणे सोडून दिल्याने निष्पापांचे बळी जात आहेत, त्यामुळे दगड खाण मालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान नागरिकांना धोकादायक दगड खाण परिसरात जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.