पालघर: पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक काळ 'रेड अलर्ट'वर राहिलेला जिल्हा म्हणून पालघरची नोंद झाली असून, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थितीमुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
शनिवारी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर डहाणूच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना हवामान बदलाचे (क्लायमेट चेंज) वाढते दुष्परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष सहन करावे लागत असून, गेल्या काही दिवसांतील विक्रमी पावसाने पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगितले.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची कार्यवाही हाती घेतली आहे.
पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करून सर्व पात्र लाभार्थ्यांना शासनाची आर्थिक मदत कोणताही विलंब न करता उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मदत वितरणाची प्रक्रिया नियमानुसार सुरू असून पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे एकूण २० व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी १३ व्यक्तींचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाले आहेत.
१९,०२६ घरांचे पंचनामे पूर्ण
घरात पाणी शिरल्यामुळे बाधित झालेल्या १९,०२६ घरांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. तसेच नुकसानीची सर्व प्रकरणे प्राधान्याने हाताळून पात्र लाभार्थ्यांना लवकर मदत मिळेल.