

ठाणे: राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ४८ हजार कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला असून, शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या माहिती पुरवत आर्थिक बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
ठाणे येथील भाजप विभागीय कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बदलते हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती आणि वीज बिल माफी योजना राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करून ना. आशीष शेलार यांनी, सरकारी, सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून जास्त अटी-शर्ती न ठेवता कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले.