पालघर ः पालघर जिल्यातील तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीत सामसूम असली तरीही महायुतीमधील भाजप आणि शिंदे सेनेत कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे. तर पालकमंत्री गणेश नाईक यांनी मवाळ भूमिका घेत तिन्ही पक्षांचे पदाधिकारी बसून योग्य अयोग्य ठरवतील आणि सारासार विचार करून महायुतीचा निर्णय होईल असे सांगितले परंतु तालुका आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांचा अंदाज विचारात घेतला जाणार असल्याचे सांगत महायुतीबाबत संदीग्धता कायम ठेवली आहे.
पालघर नगरपरिषदेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांसह अन्य पक्षातुन नगरसेवकांना प्रवेश दिल्याने भाजपची नगरसेवक संख्या तेरा पर्यंत गेली आहे. शिंदे सेनेकडे बारा माजी नगरसेवक आहेत. भाजप आणि शिंदे सेनेकडील माजी नगरसेवकांचे संख्याबळ तुल्यबळ झाले आहे. उद्धव ठाकरे गटाकडे तीन माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
भाजप आणि शिंदे सेनेकडून वेगळे लढण्याची तयारी केली जात असल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होतात पालघर भाजप आणि शिंदे सेनेत कलगीतुरा सुरु झाला आहे. भाजपने पत्रकार परिषद घेत शिंदे सेनेकडून नगर विकास विभागाचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. एक गाठ्ठा आणि पुरावे नसलेले अ आणि ब फॉर्म भरून पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचाही आरोप केला आहे. नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे बाबासाहेब कामठे यांची तडकफाडकी बदली करून सोयीस्कर ठरणारे प्रशांत जाधव यांना तात्पुरता चार्ज देऊन नंतर कायमचा चार्ज दिल्याचे भाजपचे माजी शहर अध्यक्ष अशोक अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुरुवारी पालघरच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गणेश नाईक यांनी वेगळे लढण्याबाबत पालकमंत्री गणेश नाईकांनी मवाळ भूमिका घेतली. महायुतीचा निर्णय राज्य स्तरावर होत असतो. तालुका आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांचा अंदाज आणि त्यांची भूमिकाही विचारात घेतली जाणार आहे.
महायुती करण्याआधी तिन्ही घटक पक्षांची पदाधीकारी एकत्र बसतील योग्य-आयोग्य आहे, याबाबत विचार करतील त्यानंतर महायुतीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विधान केले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल फर्न येथे वनविभागाच्या जिल्हा स्तरावरील आढावा बैठकीसाठी वनमंत्री गणेश नाईक पालघर मध्ये आले होते.
राज्यात महायुती आहे,त्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे पदाधिकारी एकत्र बसतील,योग्य आहे कुठे अयोग्य असल्याचा सारासार विचार करून महायुतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत संदीग्धता कायम ठेवली.
भाजप आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वेगळे लढण्याची भाषा करीत असताना पालकमंत्री तसेच आमदार विलास तरे महायुती बाबत आशावादी असल्यामुळे जिल्हा प्रमुखांना तोडघशी पडणार का? असा प्रश उपस्थित होत आहे.