नविद शेख
पालघर: पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंड परिसरात निसर्गाच्या कुशीत सोमवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भावनिक घटना पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेला आपल्या मृत पिल्लाला छातीशी घट्ट कवटाळून एक माकडीण बसलेली दिसत होती. तिच्या डोळ्यांतील व्याकुळता, असहाय्यता आणि पिल्लाला पुन्हा जिवंत करण्याची केविलवाणी धडपड पाहून तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे आणि वाहनचालकांचेही मन सुन्न झाले.
वाघोबा खिंडीत घडलेले हे दृश्य केवळ एका प्राण्याच्या दु:खाचे नव्हे, तर निसर्गातील मातृत्वाच्या अतूट बंधाचे प्रतीक ठरले. मृत पिल्लाला सोडण्यास तयार नसलेली माकडीण काही वेळ रस्त्यालगत बसून त्याला हलवत होती, जणू काही ते पुन्हा उठेल अशी तिची आशा अजूनही जिवंत होती. हे दृश्य पाहून अनेक प्रवाशांचे डोळे नकळत पाणावले.
रस्त्याच्या कडेला टाकलेले अन्न मिळवताना किंवा रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात पिल्लाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या परिसरात माकडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्या वारंवार रस्त्यावर ये-जा करतात, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
वाघोबा खिंड परिसरात माकडांना खाद्य दिले जाते. फळे, भाजीपाला आणि इतर पदार्थ मिळाल्याने माकडांच्या टोळ्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात थांबतात. अन्नासाठी एकमेकांमध्ये झगडे होणे, तसेच रस्ता ओलांडताना होणारे अपघात यामुळे अनेक माकडांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना अपंगत्व आले आहे.
वनविभागाने घाट परिसरात माकडांना खाद्य देऊ नये असे सूचना फलक लावले असले तरी, वाहनचालकांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येते. परिणामी, वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “माकडीण तिच्या मृत पिल्लाला काही दिवस सोडणार नाही. तोपर्यंत ती त्याला कुशीत घेऊन बसते. पिल्लू जिवंत असल्याची आशा संपल्यावर त्याचा मृतदेह दूर करेल अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक हितेश सोनी दिली.