Khodala Mokhada Road Bridge Railing Broken
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक ३७ वर वाघ नदीवरील गांधी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून पुलाचे दोन्ही बाजूंचे कठडे तुटलेले आहेत. या मार्गावर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने पुलावरून प्रवास करताना चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाघ नदीच्या विस्तीर्ण पात्रावर उभारलेला हा पूल सरळ मार्गावर असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंनी एकाच वेळी वाहने आल्यास अपघाताची शक्यता वाढते. कठडे नसल्यामुळे वाहन नदीपात्रात कोसळण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
खोडाळा–मोखाडा मार्गावरील हा महत्त्वाचा पूल जुना असून त्याच्या देखभालीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते. कठड्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होते. अपुरी प्रकाशव्यवस्था आणि तुटलेले कठडे यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येणे कठीण जाते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे चालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर अशी धोकादायक स्थिती कायम राहणे चिंताजनक आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.