Jal Jeevan Mission Pudhari
पालघर

Palghar Jal Jeevan Mission: पालघरमध्ये जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह; थकीत बिलांसाठी ठेकेदारांचे साखळी उपोषण

जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ तर दुसरीकडे ठेकेदारांचा आंदोलनाचा इशारा; निधीअभावी पाणीपुरवठा कामे रखडण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पंतप्रधानांच्या महत्त्वकांशी जल जीवन योजनेचा पालघर जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. सध्या पालघर जिल्ह्यात 8 मे ते 22 मार्च दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व सक्षम करण्यासोबतच पाणी व्यवस्थापनात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये या कालावधीत जल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असणार आहे. मात्र ज्या पाणीपुरवठ्याच्या भरोशावर हा महोत्सव साजरा होत आहे. त्या जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या पाणीपुरवठा ठेकेदारांनी मात्र थकीत बिलांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून काम केलेल्या कामांचे पैसे तातडीने मिळावे यासाठी आज पासून साखळी उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

यामुळे एकीकडे याच कालावधीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून जल महोत्सव साजरा होत असताना ठेकेदारांकडूनही त्याच वेळ साखळी उपोषण सुरू होणार असल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडणार आहे. सुरुवातीला जल जीवन मिशन योजना ही केंद्र सरकारची असल्याने त्याला तातडीने निधी उपलब्ध होईल असे सांगितले जात होते. यामुळे अनेक ठेकेदारांनी ही कामे मिळविली आणि काही प्रमाणात कामांना सुरुवात देखील केली तर काही कामे पूर्ण देखील झालेले आहेत. पालघर जिल्ह्यात सुमारे 720 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली. या योजनांची अंमलबजावणी विविध ठेकेदार अभियंते तसेच कामगार सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली काही सुरू देखील आहेत. तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत, मात्र कामे सुरू केल्यापासून म्हणजेच गेल्या दोन वर्षापासून कामांच्या बिलांचा निधी वेळेवर मिळत नसल्याने ठेकेदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

कामे पूर्ण करूनही बिलांचा निपटारा न झाल्यामुळे कामगारांचे वेतन देणे साहित्य पुरवठादारांची देणी तसेच बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे अवघड झाले आहे. यामुळे ठेकेदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून अनेक वेळा पाठपुरावा करूनही निधी न मिळाल्याने आता या ठेकेदारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. तशा पद्धतीचे निवेदन देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे.

पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे

यानुसार आज पासून पालघर जिल्हा कार्यालयासमोर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे केलेली सर्व ठेकेदार साखळी उपोषणास बसणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे त्यामुळे एका बाजूला पालघर जिल्हा परिषदे कडून जल महोत्सवच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा कार्यक्रम सुरू असणार आहे, तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजनांमधील निधी वेळेवर न मिळाल्याने ठेकेदार साखळी उपोषण करणार आहेत. मुळात निधी वेळेत न मिळाल्याने अनेक कामे देखील रखडले आहेत. ग्रामस्थ वेळोवेळी तक्रार करत आहेत मात्र ठेकेदारांच्या अगोदर केलेल्याच कामांची बिली न मिळाल्याने दुसरी कामे करण्यास ठेकेदार धजावत नाही. अशी भयान परिस्थिती जिल्ह्यात सध्या दिसून येत आहे. यामुळे येत्या काही महिन्यात पाणीटंचाईचे संकट देखील अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT