हनिफ शेख
पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात असलेल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएट विभागात काम करणाऱ्या तानाजी डावरे या कर्मचाऱ्या विरोधात एका 17 वर्षीय मुलीने विनयभंगाची तक्रार केली आहे तर त्या मुलीवर देखील सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तक्रार दाखल झालेली आहे.
मात्र असे असतानाही योग्य तपासाच्या नावाने कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र आता प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर येत असून डावरे हे शिक्षक म्हणून मोखाडा तालुक्यांत रुजू झालेले होते यानंतर त्यांची जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली.
प्रतिनियुक्ती ही एक तात्पुरती बाब असून ती 3 ते 5 वर्षांसाठी करता येते आणि शासनाला गरज असेल तर त्याचा कालावधी वाढवता देखील येतो. मात्र या शिक्षकाला आज प्रतिनियुक्तीवर घेऊन 10 वर्षे झालेली असतानाही मूळ शाळेत त्याला पाठवण्यात आलेले नाही. यामुळे डावरे पेक्षा लायक व्यक्ती जिल्हा शिक्षण विभागाला मिळत नाही काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरुवातीला तालुक्यातील कारेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले डावरे, तालुका निहाय बदलीमध्ये सध्या जिल्हा परिषद शाळा हिरवे पिंपळपाडा या ठिकाणी कागदोपत्री कार्यरत आहेत. तालुक्यात शिक्षकांची कमतरता असताना डावरे हे कागदोपत्री या ठिकाणी हजर दिसत असल्याने येथील शिक्षकाची जागा भरलेली दिसते.
यामुळे दुसरा शिक्षकही या ठिकाणी देता येत नाही. यामुळे एकाच व्यक्तीची दहा वर्षे प्रतिनियुक्ती ठेवणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र आता थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या आत मध्ये घडलेल्या या अनुचित प्रकारामुळे तरी यांच्यावर कारवाई होईल का असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
सध्या पालघर शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेले तानाजी डावरे हे शिक्षक म्हणून मोखाडा तालुक्यात कागदोपत्री हजर आहेत. आधी कारेगाव आणि आता हिरवे पिंपळपाडा या शाळेतून त्यांचा पगार निघत असल्याचे देखील दिसून येत आहे.
याबाबत यादी सुद्धा येथील लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेकडे अशा प्रतिनियुक्त्या थांबवाव्यात आणि तालुक्याला शिक्षक द्यावेत अशी मागणी देखील केली होती. याशिवाय मोखाड्यातील मासिक सभेत देखील या शिक्षकाला मूळ पदावर रुजू करावे असा ठराव देखील घेण्यात आलेला होता. यानंतरही ही प्रतिनियुक्ती न थांबवता त्यांना मुख्यालयातच कार्यरत ठेवण्यात आले.
यामुळे या अधिकाऱ्यावर नेमके जिल्हा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी का मेहरबान आहेत? हा विषय देखील महत्त्वाचा ठरतो आहे. यामुळे पगार मोखाड्यात आणि काम मात्र जिल्हा मुख्यालयात असा प्रकार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. याशिवाय याच अधिकाऱ्यामुळे सध्या एक अनुचित प्रकार घडल्याची घटना समोर आल्याने आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यात अनेक वर्ष झाल्यानंतर आपली जिल्हा बदली व्हावी यासाठी अनेक शिक्षक प्रयत्नशील असतात. यामध्ये डावरे हे सुद्धा होते आणि त्यांची जिल्हा बदली झाल्याचे देखील आता कळते आहे. मात्र तरीसुद्धा त्यांनी जिल्हा बदली नाकारल्याचे दिसून येत असले तरी जिल्हा शिक्षण विभागात ते करीत असलेल्या कामांबद्दल त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थांबविण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून निपुण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी समन्वयक म्हणून देखील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. यामुळे प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ असेल की हा घडलेला अनुचित प्रकार यामध्ये त्यांना वरिष्ठ कार्यालयाचे अभय मिळण्याची शक्यता आहे.
विनयभंग प्रकरणात काय होणार?
याबाबत कालच पत्रकारांशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी अधिकाऱ्याची कार्यालयातील वागणूक चांगली असून त्याची विशाखा समिती आणि पोलिसां कडून चौकशी होईल. त्यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले.
याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी धार्मिक कार्यक्रमात आहे नंतर बोलु असे सांगितले तर पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी याबाबत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करूनच पुढील कार्यवाही ठरणार असून याबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगितले.
मुळात विनयभंगाच्या प्रकरणात सात वर्षांच्या आत शिक्षा असल्याने अशा प्रकरणात आरोपीला तात्काळ अटकच करावी असा नियम नसल्याचे सांगण्यात येते आहे. यामुळे तपासांती पुढील कार्यवाही होणार आहे मात्र एकूणच या प्रकरणानंतर जिल्हा परिषद पालघर कार्यालय चांगले चर्चेत आल्याने यावर शिक्षण विभाग यांच्या स्तरावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.