Water Shortage Palghar Pudhari
पालघर

Water Shortage Palghar: पालघरमध्ये बाटलीबंद पाण्याचा तुटवडा? किमतीत मोठी वाढ

पुरवठा घटला, साठेबाजीची शक्यता; उन्हाळ्यात नागरिकांच्या खिशावर ताण

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

इराण आणि इस्त्रायल यांच्या युद्धामुळे सध्या देशातील अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा आणि विक्रीवर परिणाम झालेला आहे. याबाबत आत्तापर्यंत डिझेल पेट्रोल आणि गॅस चा तुटवडा भासत असल्यान याच्या किमतीत देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र अशातच आतापर्यंत सहज उपलब्ध असणाऱ्या विविध ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांचा देखील तुटवडा निर्माण झाल्याची गंभीर बाब आता समोर येत आहे. यामुळे आतापर्यंत होलसेल भावात मिळणाऱ्या पाणी बॉटलच्या बॉक्सच्या किमती देखील वाढल्याने हे पाणी महागले आहे तर काही तालुक्यात पुरवठा कमी झाल्याने अनेक दुकानदारांनी पाणी बाटलीची विक्री देखील बंद केली आहे.

यामुळे आतापर्यंत दूरवर असलेल्या युद्धाची झळ थेट नागरिकांच्या खिशापर्यंत पोहोचल्याचे एकूणच दिसून येत आहे तर सध्या उन्हाळ्यामुळे अशा बाटलीबंद पाण्याला मोठी मागणी असते आणि अशातच या बाटल्यांचा पुरवठा कमी झाल्याने तसेच याच्या किमती वाढल्याने बाजारपेठेत महागाईची झळ लागत आहे. तर पुढे जाऊन या पाणी बॉटलाच्या किमतीत दुप्पट वाढ होण्याची चित्र असल्याने काही होलसेल विक्री करणाऱ्यांनी या पाण्याच्या बाटलांची साठेबाजी केली असल्याची देखील चर्चा होत असल्याने याबाबत संबंधित विभागाने तातडीने पावले उचलणे आवश्यक बनले आहे.

सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने सर्वात बाजारपेठेत पाणी बॉटल ची मागणी देखील वाढली आहे अगदी सहजरित्या दहा रुपयांपासून वीस रुपयापर्यंत मिळणाऱ्या या पाणी बॉटल सहसा उन्हाळ्यात सर्वच प्रवासी नागरिकांच्या हातात आपल्याला पहावयास मिळतात. यामुळे कुठेही पाण्यात बदल होऊन होणाऱ्या आजारापासून देखील संरक्षण मिळते यामुळे अशा पाणी बॉटलच्या खरेदीला सर्वसामान्य नागरिक पसंती देत असतात. मात्र सध्या जगभरात चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे मात्र आता याचा थेट परिणाम पाण्याच्या बाटल्या वर होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पाण्याच्या बाटल्या निर्माण होण्यासाठी कडक प्लॅस्टिकचे उत्पादन आवश्यक असते. यामुळे या प्लास्टिकचे उत्पादन प्रामुख्याने पेट्रोलियम रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोल केमिकल उद्योगांमध्ये होते हे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनावर प्रक्रिया करून तयार केले जाते हे प्लास्टिक जसे की पॉलिथिलिन आणि उष्णता आणि रासायनिक प्रक्रिये द्वारे कडक स्वरूपात बनवले जातात. या कडक प्लॅस्टिकचे उत्पादन सहसा मोठ्या औद्योगिक पेट्रोल केमिकल संकुलामध्ये जिथे कच्च्या तेलाचे डिस्टिलेशन केले जाते तिथे प्लास्टिक निर्मितीची सुरुवात होते.यामुळे सध्या या पाण्याच्या बाटल्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे एकूणच दिसून येत आहे.

मुळात गॅसचा तुटवडा भासण्याच्या कालावधीच्या अगोदर अनेक पाण्याच्या बाटल्या तयार झालेल्या असतील मात्र आता या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा संदर्भ देत जुनी उत्पादन देखील महागात विकण्याची शक्कल बाजारपेठेतील अनेक साठेबाजांनी लढवल्याचे दिसू देत आहे. कारण की आज या पाण्याच्या बॉक्समध्ये जवळपास 11 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या साध्या ब्रँडच्या पाणी बॉटल च्या बॉक्सवर तब्बल 30 ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे ही वाढ करूनही सहजरित्या हवे तेवढे पाणी बॉक्स बाजारपेठेत मिळत नसल्याने आता प्राण्यांच्या बाटल्याची भाव देखील दुपटीने वाढण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत 12 पाणी बॉटल असलेला बॉक्स 70 ते 80 रुपयात उपलब्ध होता त्याची सध्या बाजारात किंमत 120 ते 130 रुपये करण्यात आलेली आहे तर 24 पाणी बॉटल असलेला छोटा पाणी बॉक्स म्हणजेच अर्धा लिटर पाणी बॉक्स ची किंमत 110 ते 120 होती तो आता 150 हून अधिक किमतीने विकला जात आहे. यामुळे आता पाण्याची किरकोळ विक्री देखील एक लिटर पाणी बॉटल 25 आणि अर्धा लिटर पाणी बॉटल 15 रुपये अशी होण्याची चिन्हे आहेत यामुळे जीवनावश्यक वस्तू मधील बाटलीबंद पाणी महागल्यास याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची चिन्हे आहेत.

साठेबाजांवर लक्ष देणे आवश्यक ...

युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशावर आलेले संकट हे सर्वसामान्य नागरिकांवर आलेले संकट असते अशावेळी देशातील सर्व स्तरातील नागरिकांची जबाबदारी ही अशा परिस्थितीत सकारात्मक विचार करून सर्वांना पर्यायाने देशाला सांभाळून घेण्याची असायला हवी मात्र काही साठे बाजार करून या संकटाला संधी समजून अनेकदा जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होताना दिसून येत आहे सध्या हॉटेल व्यवसायासाठी पुरविण्यात येणारा सिलेंडर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तर सर्वसामान्यांसाठी देखील गॅसची बुकिंग ही 45 दिवसानंतरच होईल या पद्धतीने कार्यवाही करण्यात आलेली आहे. मात्र तरीसुद्धा अनेक हॉटेल व्यवसायिक बिंधीक्तपणे आपला व्यवसाय करीत आहेत. तर बाटलीबंद पाणी देखील अनेक होलसेल विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे उपलब्ध असतानाही किंवा त्यांना पुरवठा होणाऱ्या कंपनीकडे उपलब्ध असतानाही जाणीवपूर्वक त्याची साठेबाजी होत असल्याचे चित्र आहे .

महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्चरर्स

असोसिएशन कडून सूचना जाहीर

पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन करणाऱ्या राज्यातील असोसिएशन कडून एक सूचना जारी करण्यात आली आहे यामध्ये वितरक व ग्राहकांना सुचित करण्यात येते की सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे कच्चामाल पॅकेजिंग साहित्य तसेच वाहतूक खर्चामध्ये लक्षणे वाढ झाली आहे या कारणास्तव पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सारख्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली असून त्यामुळे दरबार करणे आवश्यक आहे म्हणून 6 मार्च 2026 पासून प्रत्येक पाण्याच्या बॉक्सच्या किमतीमध्ये 10 रुपयांची वाढ करण्यात येत आहे याची सर्व वितरक व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे एक पत्र या असोसिएशन कडून जाहीर करण्यात आले आहे. याउलट किरकोळ बाजारात मात्र बॉक्स मागे 30 ते 50 रुपये वाढवल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT