Why are bars shut in Maharashtra today?
मुंबई : राज्य सरकारने मद्यावरील उत्पादन शुल्कात केलेल्या प्रचंड वाढीविरोधात मुंबई, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर अशा सर्व प्रमुख शहरांमधील हॉटेल आणि बार मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सोमवारी (14 जुलै) रोजी राज्यातील सुमारे 20 हजार बार आणि हॉटेल एक दिवससाठी बंद असतील. सरकारच्या या धोरणामुळे व्यवसायच धोक्यात आल्याचा आरोप हॉटेल रेस्टॉरंट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
राज्य सरकारने जून महिन्यात तिजोरीचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशी, भारतीय बनावटीच्या विदेशी आणि आयात विदेशी मद्याच्या प्रीमियम ब्रँडच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याने देशी- विदेशी मद्याच्या दरात तब्बल 9 ते 70 टक्के वाढ होणार आहे. तसेच मद्यविक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही 10 ते 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील हॉटेल आणि बार मालक असोसिएशन तीव्र विरोध दर्शवला आहे.
सोमवारी राज्यात पालघर, नागपूर, अमरावती, जळगावसह ठिकठिकाणी बार आणि हॉटेल मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. आज दिवसभरासाठी राज्यातील तब्बल 20 हजारपेक्षा अधिक बार बंद आहेत. हॉटेल मालकांसोबतच वेटर, स्वयंपाकी आणि इतर कर्मचारीही सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते.
बार हॉटेल असोसिएशने पुकारलेल्या या एक दिवसाच्या बंदला पुणे, अमरावती, नाशिक या भागातील प्रतिसाद मिळाला. शहरातील बार सोमवारी बंद ठेवण्यात आले होते.
‘लाडकी बहीणसाठी आमच्या व्यवसायाचा बळी’
'लाडकी बहीण' योजनेसाठी निधी उभारण्याकरिता सरकार आमच्या व्यवसायाचा बळी देत आहे, असा आरोप पालघरमधील पदाधिकाऱ्यांनी आंदोलनप्रसंगी केला. पालघरमधील हुतात्मा स्तंभ परिसरात एकत्र येत मालकांनी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
‘एका परमिट रुममधून किमान 15 जणांना रोजगार’
राज्यभरात 21 हजार परमिट रूम असून प्रत्येक परमिट रूम मध्ये किमान पंधरा जणांना रोजगार मिळतो. सरकारने परमिट रूमवर लावलेला व्हॅट हजारो लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड चालवणारा आहे असा आरोप नागपूरमधील संघटनेचे अध्यक्ष राजू जैस्वाल यांनी केला. सरकारच्या अशा धोरणामुळे राज्यात अवैध दारूचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील असा इशाराही त्यांनी दिला.
“आम्ही कुठे जायचे”
"आधीच वाढलेल्या दरांमुळे ग्राहक कमी झाले आहेत. आता ही शुल्कवाढ झाली, तर ग्राहक आणखी कमी होतील आणि त्याचा थेट परिणाम आमच्या नोकरीवर होईल. आम्ही कुठे जायचे?" असा उद्विग्न सवाल हॉटेल कर्मचारी नीरज वर्मा आणि गौतम लालदेबा यांनी उपस्थित केला. पालघरमधील आंदोलनात ते सहभागी झाले होते.