पालघर: तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने माय-लेकांना जोरदार धडक दिल्याने आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हालोली गावाच्या हद्दीतील पाडोस पाडा परिसरात गुजरात वाहिनीवर झालेल्या अपघातात प्रतीक्षा (वंदना) पाडोसा (40) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा तुषार प्रभाकर पाडोसा (18) गंभीर जखमी झाला आहे.
अपघाता नंतर कार महामार्गालगत उलटली. कारमधील चालकासह तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांनाही उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर जखमी तुषार पाडोसा याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झालेल्या मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पाडोस पाडा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने येथे उड्डाणपूल किंवा पादचारी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा केली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महामार्गावरील अपघाताच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाडोस पाड्यातील ग्रामस्थांच्या सुरक्षितते साठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
मागील काही वर्षात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी सुरू असलेली अर्धवट कामे तर अनेक ठिकाणच्या कामांचा निकृष्ठ दर्जा यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या निर्माण झाली असून तिच्यावर तोडगा कधी निघणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मात्र महामार्गावरील विविध समस्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक ठिकाणी नसलेल्या पादचारी पुलांमुळे महामार्गानजीकच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ,अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत.