डहाणू: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी येथील खडकीपाडा परिसरात झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमींना प्रकृती पूर्णपणे सुधारण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाकडून डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली. जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असताना त्यांना घाईघाईने डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
18 मे रोजी साखरपुड्यासाठी टेंपोमधून प्रवास करणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाचा धानिवरी येथील खडकीपाडा परिसरात भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 17 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. काही जखमींवर सध्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दि. 3 जून रोजी आमदार विनोद निकोले यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. काही रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच आवश्यक उपचार पूर्ण होण्यापूर्वीच काही रुग्णांना डिस्चार्ज देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गंभीर जखमी रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्याशिवाय त्यांना रुग्णालयातून सोडू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
दरम्यान, अपघातानंतर बापुगावच्या लाखातपाड्यात झालेल्या अंत्यविधीप्रसंगी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते.
अपघातातील कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलेल तसेच आदिवासी विकास विभाग कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारेल, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र, अपघाताला 18 दिवस उलटल्यानंतरही अनेक जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.
शासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली.