Mobile tower malfunctions at a company in Dhekale village on Mumbai-Ahmedabad highway
पालघर : स्मार्ट फोन आणि इंटरनेट शिवाय तास भरही निघत नसताना महामार्गावरील ढेकाळे गावात मोबाईल नेटवर्क दहा दिवसांपासून गुल झाले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील ढेकाळे गावातील एका कंपनीत मोबाईल टॉवर मध्ये बिघाड झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून ढेकाळे गाव नॉट रिचेबल अवस्थेत गेला आहे. ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क टॉवर मधील बिघाड दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जिओ कंपनीच्या ग्राहकांनी केला आहे.
मोबाईल टॉवर मध्ये झालेल्या बिघाडामुळे जिओ कंपनीचे सिम कार्ड असलेल्या मोबाईलचे नेटवर्क गुल झाले आहे. नेटवर्क नसल्याने आठ ते दहा गावांमधील हजारो ग्राहकांच्या महत्वाच्या कामांना अडथळा येत असल्यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. गणेशोत्सव काही दिवस शिल्लक असताना बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रणासाठी संपर्क साधताना अडचणी येत आहे.
ढेकाळे गावातील मोबाईल टॉवर मधून ढेकाळे, गांजे, जानसई,खैरे, सुळशेत, वेहलोली, बांबरोठे आदी गावांमधील संबधीत कंपनीच्या ग्राहकांना नेटवर्क उपलब्ध होते.मुंबई अहमदाबाद महामार्गा लगत असलेल्या ढेकाळे गावात कंपनीच्या नेटवर्कसाठी उभारलेल्या टॉवर मध्ये बिघाड झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून नेटवर्क नसल्याने इंटरनेट सेवा बंद झाल्याने व्हाट्सअप, समाज माध्यमांपासून संपर्काच्या अन्य सेवा चालत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.