Corrupted Reddy's name plate at Vasai-Virar Municipal Corporation office
खानिवडे : पुढारी वृत्तसेवा
वसई-विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे तात्कालीन उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरोधात सक्त वसूली संचलनालयाने केलेल्या कारवाई नंतर आयुक्त अनिल कुमार पवार यांनी रेड्डी यास निलंबित करण्याची कारवाई केली असली तरी या दालनास अजूनही त्यांच्या नावाची पाटी पालिकेने जतन करून ठेवलेली आहे. यामुळे करदात्या नागरिकांमध्ये पालिका प्रशासन चुकीचा संदेश पोहोचवण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पालिकेत मात्र अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे नाम फलक का ठेवले आहेत.
असाही सवाल उपस्थित केला जात आहे. १५ मे रोजी सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत विविध ठिकाणी धाडी घालण्यात आल्या होत्या. यात रेड्डी याच्या हैदराबाद येथील निवास स्थानातून कोटी रुपयांची माया मिळून आली. तेव्हापासून रेड्डी यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान आयुक्त पवार यांनी निलंबनाची कारवाई केली. असे असतानाही उपसंचालकाच्या दालनास अजूनही रेड्डी यांचे नाम फलक असल्यामुळे विविध चर्चाना उधाण आलेले आहे.
पालिकेने अशा लाचखोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाचे फलक लावले आहेत का? त्या विरोधात कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस कडून व्यक्त केले आहे. नगररचना विभागाच्या बदली प्रकरणा नंतरही सुरू असलेले प्रकार हे चिंताजनक असून निलंबित अधिकाऱ्याचा या प्रकरणा नंतर नाम फलक जागेवर असणे अनाकलनीय असल्याचे मत धनंजय गावडे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान वाय एस रेड्डी यांचा पालिकेतील कार्यकाल अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. त्यांना २५लाखाची लाच घेतल्या प्रकरणी २०१६ ला अटक केली होती. त्यावेळी कायद्यानुसार ते ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकारानंतर त्याप्रमाणे रेडी यांनी पुन्हा आपल्या सेवाकाळात काही नियमबाह्य कामे करायला सुरुवात केली होती. मात्र याबाबतच्या काही तक्रारी ईडीकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या तक्रारींची गंभीर दखल घेऊन ईडीने १४ आणि १५ मे या दोन दिवशी पी एम एल ए ऍक्ट २००२ अन्वये रेडी यांच्या हैदराबाद मधील वेगवेगळ्या ठिकाणावर धाडी टाकल्या असता या धाडीत ८.६ कोटी रुपये रोकड आणि २३.२५ कोटींचे मौल्यवान दागिने सापडले. या संपूर्ण कारवाईनंतर वाय एस रेडी यांना निलंबित करण्यात आले आहे.
रेड्डी हे या कार्यालयात नियुक्त होते त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. परंतु, त्यांच्यावर झालेल्या आरोपाची खातरजमा सिद्धता झाल्या नंतरच पुढील कारवाई होईल. अशी माहिती दिली आहे.- अनिल कुमार पवार, आयुक्त