बोईसर: बोईसर पूर्वेकडील यादव नगर परिसरातील नागरिकांना तब्बल सात दिवसांच्या अंधारानंतर अखेर दिलासा मिळाला असून, महावितरणकडून नव्या ट्रान्सफॉर्मरची उभारणी करण्यात आल्याने वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. सततचा ब्रेकडाऊन, लो-व्होल्टेजची समस्या आणि वाढत्या वीज वापरामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
यादव नगर परिसरात यापूर्वी १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यरत होता. मात्र, वाढती लोकसंख्या आणि वीज वापरामुळे संबंधित ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण निर्माण होत होता. परिणामी वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने मागील आठवडाभरापासून वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये नागरिकांना अंधार व उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयात पाठपुरावा करूनही नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अखेर नागरिकांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा समाजसेवक संजय जे. पाटील यांच्याकडे धाव घेत समस्या मांडली.
यानंतर संजय पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. वाढत्या वीज भाराचा विचार करून अधिक क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत पाठपुरावा करण्यात आल्याने परिसरात २०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सात दिवसांनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत मदतीसाठी संजय पाटील यांचे आभार मानले आहेत.