Palghar News : मालवाहू रेल्वे प्रकल्पाच्या पुलालगतचे १४ खांब पाडले  File Photo
पालघर

Palghar News : मालवाहू रेल्वे प्रकल्पाच्या पुलालगतचे १४ खांब पाडले

वसई तालुक्यातील पायगावच्या हद्दीत करण्यात आले पाडकाम

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पुढारी वृत्तसेवा

समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पाच्या (वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) वसई तालुक्याच्या सीमेवरील पायगावच्या हद्दीत एक किलोमीटर लांबीच्या अंतरावर बांधकाम पूर्ण झालेले खाडी लगतचे तेरा ते चौदा पिलर आणि गर्डरचे तोडकाम करण्यात आल्याने पिलरचा आराखड्या सह बांधकामातील त्रुटींबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पाडकाम केलेला भाग मालवाहू रेल्वे प्रकल्पाच्या व्हायाडक्टचा भाग होता. पाडकामा बाबत ठेकेदार कंपनी कडून अधिकृत कारण देण्यात आले नाही, परंतु खाडी लगतचे पिलर तीन ते चार फूट खचल्याने पाडकाम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाईल असे सांगितले. पायगाव येथील पाडकामामुळे समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीच्या वेळेत वाढ झाली आहे.

रेल्वे प्रवाशांकडून पाडकामाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. चौदा पिलरचे बांधकाम आणि गर्डरचे पाडकाम केले जाते, याची जबाबदारी कोणाची? पाडकामामुळे समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पाच्या डेडलाइनवर परिणाम होऊ शकतो?

असा प्रश्न सौरभ राऊत यांनी एक्स पोस्ट द्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान मोदी यांना टॅग करून विचारले आहेत. पाडकामाला 'तांत्रिक समस्या' म्हटले जात आहे, परंतु पिलर बांधकामा पूर्वी पायलिंग, घाट बांधणी आणि गर्डर लाँचिंग टप्प्यात ठेकेदार कंपनीचे अभियंते काय करत होते? असा प्रश्न राऊत एक्स पोस्टद्वारे केला असून बांधकामातील नियोजनातील गडबडीची पहिलीच घटना नाही असे सांगत. राऊत यांनी बोईसरच्या पलीकडे ब्लॅकेट आणि ड्रेनेज लेव्हलपर्यंतचे मोठे काम पूर्ण झाल्यानंतरही सरेखन पुन्हा करावे लागल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यांनी पाडकामा बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, ठेकेदार कंपनीला जागा उपलब्ध करून दिली असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्प प्राधिकरण ताब्यात घेईल. त्यामुळे पायगाव येथे केलेल्या पाडकामा बाबत ठेकेदार टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी उत्तर देईल असे सांगितले. ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाडकामाची माहिती डीएफसीएलच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून घेण्याचे सांगत हात वर केले.

समर्पित मालवाह रेल्वे प्रकल्प नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपासून उत्तर प्रदेशातील दादरी पर्यंत १,५०६ किमी लांबीचा आहे, पाच राज्यांमधून जाणार आहे. कंटेनर, आयात केलेला कोळसा, खते आणि अन्नधान्यांच्या वाहतूकीसाठी एक महत्त्वाचा मालवाहतूक मार्ग ठरणार आहे.

राज्यात समर्पित मालवाहू प्रकल्पाची चाचणी २७ एप्रिल रोजी पार पडली. नवीन उंबर-गाव रोड तेन्यू सफाळे पर्यंतच्या ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर चाचणी पार पडली. कॉरिडॉर मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन होते परंतु, विविध अडथळ्यांमुळे डिसेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

पायगाव येथील पाडकामामुळे समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीच्या वेळेत वाढ झाली आहे.

भारताच्या नियंत्रक आणि लेखापरीक्षक जनरल (C-C) यांनी मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणात समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या कामात विलंब झाल्याचे म्हटले आहे. तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन, उपयुक्तता शिफ्टिंग, आरेखन आणि ओव्हर हेड उपकरणांच्या कामातील विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर

लांबी १,५०६ किमी

मार्गः उत्तर प्रदेशातील दादरी ते नवी मुंबई, JNPT

समाविष्ट राज्ये - यूपी, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT