मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांचा पुरावा पुन्हा एकदा सांडवा पुलावर पाहायला मिळाला. या पुलाजवळील नाल्यात घाणकचरा साचल्याने पाणी तुंबले आणि रक्तमिश्रित पाणी थेट पुलावर आले. सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत हे दूषित पाणी वाहात होते. मनपा प्रशासनाने अखेरचा पर्याय म्हणून थेट मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह खुला करून शुद्ध पाण्याने या घटनेवर पडदा टाकला.
शहरात कत्तलखान्यांऐवजी थेट गल्ल्यांमध्ये जनावरांची कत्तल होते. त्याचा मैला, मांस आणि रक्त थेट गटारे व नाल्यांच्या माध्यमातून मोसम नदीपात्रात येते, अशी सामाजिक कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. याविषयी रामदास बोरसे यांचा सातत्याने लढा सुरू असला, तरी संबंधितांच्या अभद्र युतीमुळे यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मोठ्या नाल्यातून नेहमीच वाहणारे रक्तमिश्रित पाणी रविवारी थेट पुलावर आलेले ये-जा करणार्या नागरिकांच्या द़ृष्टीस पडले. 9 वाजता सामाजिक कार्यकर्ते धडकले. त्यानंतर पोलिसांचेही पथक बघ्याच्या भूमिकेत आले. मनपा अधिकार्यांशी संपर्क साधल्यानंतर दोन कर्मचारी गटार प्रवाही करण्यात व्यग्र झाले. त्यानंतर मुख्य जलवाहिनीचाच व्हॉल्व्ह खुला करून पूल स्वच्छ होईपर्यंत हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया घालवण्यिात आले.