नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भारत हा विविधतेने नटलेला तसेच विविध जाती धर्माचा देश आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशात एकता नांदावी, म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर असा समग्र देश एकत्र करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्यामुळेच आजचा समृध्द भारत देश जगभरात नावलौकीकास पावला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. काळे बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डी. टी. जाधव, एनसीसी विभागाचे प्रमुख लेप्ट. पी. सी. गांगुर्डे, सात महाराष्ट्र बटालीयनेचे हवालदार बाबा दहातोंडे, एनएसएस प्रमुख मिलींद ठाकरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवसाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमापूजनाने झाली. तसेच हिरवा झेंडा दाखवत एकता दौडला प्रारंभ करण्यात आला. लॅमरोड व देवळाली कॅम्प या मार्गे ही दौड झाली. तत्पूर्वी युनिवर्सल अकॅडमीचे राहुल शिंदे यांचे राष्ट्रीय एकतेवर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला एस. एम. जाधव, एस.बी. सिंग, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख एस. एस. कावळे, डॉ. जयश्री जाधव आदी उपस्थित होते.