येवला : पुढारी वृत्तसेवा
नगर परिषद निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येवला शहरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून, राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी एकमेकांविरोधात लढविली होती. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. मात्र निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेच्या सात नाराज नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.
या सात नगरसेवकांनी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना संबंधित नगरसेवक हे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याची भावना व्यक्त केली.
स्थानिक पातळीवरील काही कारणांमुळे नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत पवार, मोहन शेलार, सुनील पैठणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निर्णयामुळे येवला शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याची चर्चा सुरू असून, आगामी राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विकासाला प्राधान्य
नगरसेवकांनी सांगितले की, विकासाला प्राधान्य देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणे, हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. भुजबळ कुटुंबाने येवला तालुक्यात राबविलेल्या विविध विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
विकास योजनांबाबत चर्चा
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला संपर्क कार्यालयात झाली. या बैठकीत शहरातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार काम करीत आहे. त्याच धर्तीवर येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व घटक पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार या बैठकीत केला.