सध्या भौतिक विकास आणि वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणीय ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नाकारता येत नाही. जागतिक हवामान बदल हा त्याचाच परिणाम आहे. पर्यावरणीय ऱ्हास आणि आदिवासी समुदायाचे विस्थापन या गोष्टी सोबतच घडल्या आहेत. किंवा आदिवासींचे विस्थापन होणे हे पर्यावरणीय ऱ्हासाचे एक कारण असल्याचे मत अभ्यासक मांडत असतात. आज दि. ९ ऑगस्ट 'जागतिक आदिवासी दिन' दिनानिमित्त आदिवासी आणि पर्यावरण यांचा घेतलेला धाडोळा...
विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन जगणारा पण अक्षर ओळख नसलेल्या स्थानिक गटाचा समूह म्हणजे आदिवासी. अशी आदिवासी समाजाची व्याख्या करण्यात आली आहे. विशिष्ट भूप्रदेशातील वास्तव्य हे आदिवासींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या गरजा विशिष्ट भूप्रदेशातूनच पूर्ण करून जगणारा समूह असल्यामुळे आदिवासी जमातींनी आपापल्या भूप्रदेशाची काळजी कसोशीने घेतली. हा प्रदेश त्यांच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा सदैव आधार राहिला आहे. त्यामुळेच आदिवासी समुदाय हा निसर्गपूजक असल्याचे दिसून येते. सूर्य, चंद्र, तारे, नद्या, डोंगर, दऱ्या, झाडे, वाघ, नाग, पशू-पक्षी, विविध धान्य याच आदिवासींच्या नैसर्गिक देवता आहेत.
आजही विविध आदिवासी समुदाय या सर्वांची किंवा यापैकी काहींची पूजा आणि उपासना करताना दिसून येतात. अनेक आदिवासी जमातींचे कुलचिन्ह हे निसर्गातील झाडे, प्राणी हे आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार जागतिक लोकसंख्येपैकी ४७ कोटी ६० लाख इतकी आदिवासी जमातींची लोकसंख्या असून, ती एकूण लोकसंख्येच्या ६.२ टक्के इतकी आहे. १२ कोटी ५० लाख या संख्येसह चीन प्रथम क्रमांकावर असून, १० कोटी ४० लाख इतक्या संख्येने भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
यानंतर इंडोनेशिया, पाकिस्तान, मेक्सिको, फिलिपीन्स, व्हिएतनाम या देशांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण या निकषानुसार सामोआ ९६ टक्के, ग्रीनलंड ८९ टक्के, फ्रेंच पोलिनेशिया ८० टक्के, पापुआ न्यू गिनी ५० टक्के, लाओस ५० टक्के हे देश किंवा प्रदेश येतात.
दि. ९ ऑगस्ट १९८२ रोजी जिनेव्हा येथे युनायटेड नेशन वर्किंग ग्रुप ऑन इंडिजेनअस पॉप्युलेशनची पहिली बैठक झाली. त्यानंतर डिसेंबर १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली. बांगलादेशातील चकमा जमातीचे रेबंग देवाण यांनी रेखाटलेल्या बोधचिन्हास अधिकृत मान्यता देण्यात आली. हा दिवस साजरा करण्याचे काही उद्देश समोर ठेवण्यात आले.
आज भारतासह जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात आदिवासी समुदायाकडून साजरा केला जात आहे. मात्र, आदिवासी जमाती समोर असणाऱ्या समस्या कायम आहेत. आदिवासी समुदाय, समाज आणि सरकार या तिघांनी हातात हात घालून काम केल्याशिवाय त्या सुटणार नाहीत. पर्यावरणाचा ऱ्हास ही समस्या केवळ आदिवासींची नाही तर संपूर्ण मानव जातीची आहे.
शाश्वत विकासाचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जगभराच्या आदिवासी जमातीकडील पारंपारिक ज्ञान याच्या संगमाने जगाला अजून सुंदर आणि मानवजातीच्या येणाऱ्या पिढ्यांना राहण्यालायक करू शकेल का? निदान आपण या दृष्टीने विचार करू शकू का? की यापुढेही हरारींच्या कथेत सांगितल्याप्रमाणे आदिवासींना त्यांच्या बोलीभाषेत परग्रहवासीयांना संदेश पाठवावे लागतील? यावर विचार आजच्या आदिवासी दिनानिमित्त होणे गरजेचे आहे.
हिरामण झिरवाळ(लेखक, 'जेथोड' या आदिवासी समाज जीवनाचे चित्रण असलेल्या राज्य पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक आहेत)
हा दिवस साजरा करण्याचे उद्देश:
आदिवासींच्या हक्काचे संरक्षण यात मानवी हक्क आणि सामान संधी यांचा समावेश होतो.
आदिवासींच्या भाषा, परंपरा आणि समृद्ध संस्कृतीबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे.
निसर्ग व पर्यावरण वाचवण्यात आदिवासी समुदायाने दिलेल्या योगदानाचा गौरव करणे.
आदिवासी समुदायातील गरिबी, आरोग्य, शिक्षण व विस्थापन या समस्या जगासमोर आणणे.