नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशभरात महामार्ग, रेल्वेमार्ग, कालवे आणि उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे झपाट्याने विस्तारत असताना वन्यजीवांसाठी हे मार्ग मृत्यूचे सापळे ठरत आहेत. रस्ते किंवा रेल्वे अपघातात दरवर्षी साप, हरीण, रानडुक्कर, बिबट्या, वाघ, हत्ती यांसारख्या अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असला, तरी अशा घटनांची सर्वंकष आणि शास्त्रीय नोंद उपलब्ध नसल्याने प्रभावी उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत.
ही उणीव भरून काढण्यासाठी 'रोडकिल्स इंडिया' हे विशेष मोबाईल ॲप विकसित केले असून, नागरिकांच्या सहभागातून देशातील वन्यजीव मृत्यूंचा राष्ट्रीय डेटाबेस तयार केला जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक, वनप्रेमी, संशोधक आणि स्वयंसेवी संस्था रस्त्यावर किंवा रेल्वेमार्गाजवळ मृतावस्थेत आढळलेल्या वन्यप्राण्यांची छायाचित्रे, जीपीएस लोकेशन, प्रजाती आणि इतर माहिती अपलोड करू शकणार आहेत.
इंटरनेट सुविधा नसलेल्या भागातही माहिती साठवून नंतर अपलोड करण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध आहे. संकलित माहितीचा उपयोग राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच राज्य वनविभागाकडून नियोजनासाठी केला जाणार आहे.
राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील वनक्षेत्र - २० टक्के
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प - ६
ॲपद्वारे नोंद होणाऱ्या घटना - रस्ते, रेल्वेमार्ग, कालवे व वीजवाहिन्यांमुळे होणारे मृत्यू
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर) : वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, सांबर
पेंच व्याघ्र प्रकल्प (नागपूर) : वाघ, बिबट्या, रानकुत्रे, चितळ
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती) : वाघ, बिबट्या, अस्वल, गवा
नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प (गोंदिया) : वाघ, बिबट्या, रानगवा, हरीण
बोर व्याघ्र प्रकल्प (वर्धा) : वाघ, बिबट्या, सांबर, नीलगाय
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (सातारा - कोल्हापूर) : बिबट्या, वाघ, रानगवा, शेकरू
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई) : बिबट्या, सांबर, चितळ, माकडे
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य (पुणे) : शेकरू, बिबट्या, रानडुक्कर
कोयना वन्यजीव अभयारण्य (सातारा) : गवा, अस्वल, बिबट्या
राधानगरी वन्यजीव अभयारण्य (कोल्हापूर) : भारतीय गवा, अस्वल, बिबट्या
महाराष्ट्रात ६१ हजार चौरस किलोमीटरहून अधिक नोंदणीकृत वनक्षेत्र असून, ते राज्याच्या सुमारे २० टक्के भौगोलिक क्षेत्रावर पसरले आहे. राज्यात ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर, सह्याद्री, मेळघाट यासह सहा व्याघ्र प्रकल्प, अनेक अभयारण्ये आणि संवेदनशील वन्यजीव अधिवास आहेत. या जंगलांमधून अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात असल्याने वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूची समस्या गंभीर बनत आहे.
विशेषतः विदर्भातील ताडोबा, पेंच, उमरेड-करांडला आणि नवेगाव-नागझिरा परिसरात वन्यजीवांच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनांच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रकार वारंवार घडतात.
या घटनांची अचूक नोंद उपलब्ध झाल्यास वन्यजीव मार्ग, अंडरपास, ओव्हरपास, संरक्षक कुंपण, वेगमर्यादा, चेतावणी फलक आणि रात्रीच्या वाहतूक नियंत्रणासारख्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील.
महाराष्ट्रातील ही वनक्षेत्रे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या संपर्कात असल्याने वन्यजीवांच्या रस्ते अपघातांचा धोका अधिक असून, 'रोडकिल्स इंडिया' ॲपमुळे या संवेदनशील भागातील घटनांची शास्त्रीय नोंद होऊन संरक्षणात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत