नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक गॅसच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसह पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ होऊन गॅस, प्लास्टिक, रसायने, खते महागल्याने पूरक उद्योगांवरील खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे महागाई वाढल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे.
युद्धामुळे जागतिक तेल वाहतुकीतील २० टक्के आणि द्रवरूप नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा विस्कळीत झाला आहे. इराण आणि इस्रायलकडून गॅस आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी काही वर्षे लागतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे इंधन दरवाढ अटळ मानली जात आहे.
युद्धामुळे जागतिक बाजारातून सुमारे ४० कोटी बॅरल तेलाचा पुरवठा घटला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढून ११० डॉलर्स प्रतिबॅरलवर गेल्या आहेत.
युरोपमध्ये जेट इंधनाच्या किमती प्रतिबॅरल सुमारे २२० डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे विमान वाहतूक महागली आहे. भारताने घरगुती एलपीजीचे दर सिलिंडरमागे ६० आणि व्यावसायिक एलपीजीचे दर ११५ रुपयांनी वाढवले आहेत. तसेच, पॉवर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.०९ ते २.३५ रुपयांनी वाढ केली आहे.
खतपुरवठा साखळी विस्कळीत खतांचा एकतृतीयांश पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. येथील जलवाहतूक बंद असल्याने युरिया, अमोनिया आणि फॉस्फेटसारख्या खतांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, युद्ध सुरू झाल्यापासून खतांच्या किमती ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
डिझेल दरवाढीने महागाई भडकणार
पश्चिम आशियातील युद्धामुळे केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठीच्या बल्क डिझेलच्या दरात सुमारे २२ रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला आणि अन्नधान्याच्या वाहतूक दरात मोठी वाढ होऊन महागाईची झळ आणखी वाढणार आहे
रुपया पुन्हा घसरला, डॉलर वधारला
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलर वधारल्याने आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीचा मारा सुरू ठेवल्याने, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ८२ पैशांनी घसरून ९३.७१ या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.