चांदवड : पुढारी वृत्तसेवा
चांदवड तालुक्यातील वडाळीभोई गावात एसटी बस थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही एसटी प्रशासनाने कोणतीही ठोस दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २९ जून) सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समस्त वडाळीभोईकरांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रकानुसार, वडाळीभोई गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार असून, परिसरातील तब्बल २२ खेड्यांतील नागरिकही प्रवासासाठी वडाळीभोई येथे येतात. दररोज शेकडो नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच नोकरदार व व्यापारी एसटी सेवेवर अवलंबून आहेत.
दिवसाभरात सुमारे ३०० बस या मार्गावरून ये-जा करतात. मात्र, अनेक बस वडाळीभोई येथे न थांबता पुढे जातात. काही बसमध्ये प्रवासीसंख्या कमी असूनही त्या थांबत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परिणामी, प्रवाशांना दोन ते तीन तास बसची प्रतीक्षा करावी लागते. या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी व मागण्या करूनही कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
त्यामुळे सोमवारी (दि. २९) सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, महिला व युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.