नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुसुमाग्रज नगरीत भरणाऱ्या चौथ्या विश्व मराठी संमेलनानिमित ३५ राज्यस्तरीय पुरस्कार आणि कलारत्न, साहित्यरत्नबरोबरच अष्टांग कलेमधून दीपस्तंभासारखे नैपुण्य असणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी नाशिकमधूनच विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कारांची घोषणा मुंबईत दि. १७ फेब्रुवारी रोजी करणार असल्याची माहिती उद्योग आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री सामंत यांनी रविवारी (दि. १५) मविप्रमध्ये मराठी विश्व संमेलनाच्या नियोजन तयारीचा आढावा घेतला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते. मंत्री सामंत यांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाच्या संकेतस्थळ व कार्यालयाचे उद्घाटन स्वाक्षरी करून करण्यात आले.
दि. २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च असे तीनदिवसीय 'विश्व मराठी संमेलन' पार पडणार आहे. संमेलनाचे उद्घाटन २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होईल. प्रत्यक्ष कार्यक्रमांची सुरुवात २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेस सुरुवात होईल. दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० पासून रात्री ११ पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. बोलीभाषा महोत्सव, हशा उत्सव, कोकण, नागपूर, अहिराणी, परभणी भागांतील संगीत नाट्य सादरीकरण होईल. पहिल्या दिवशी नीरज शिरवईकर दिग्दर्शित 'आमने सामने' हे नाटक सादर होणार आहे.
दुसऱ्या दिवशी 'मनाचे श्लोक', लोककला, माध्यम, एआय आणि मराठी भाषा यावर परिसंवाद होतील. योग प्रशिक्षण, वारकरी संप्रदाय, बोलीभाषांचे सादरीकरण असे उपक्रम राबविले जाणार आहेत. तिन्ही दिवशी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दि. २७ फेब्रुवारीस गायक राहुल देशपांडे यांचा सांगीतिक कार्यक्रम होईल. मुख्य रंगमंचासोबत गझल कट्टा, कुमार मेळावा, लोककला व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुस्तकांचे गाव उपक्रमास मदत
शिरवाडे-वणी येथेही २६ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रम होणार आहे. 'पुस्तकांचे गाव' उपक्रमाला मदत करण्यात येणार आहे. संमेलन पूर्णपणे राजकारणविरहित असेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
यासाठी विश्व मराठी संमेलन
मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार-प्रसार जागतिक स्तरावर व्हावा, समाजात मराठीतून संवाद साधण्याची रुची वाढावी आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर व्हावा, या उद्देशाने मराठी भाषा विभागातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.