दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वास्को, वाडे-संभाजीनगर येथील वाडे तलाव कोणत्याही खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न तत्काळ थांबवून तलाव मुरगाव पालिकेच्या ताब्यात द्यावा, अशी जोरदार मागणी नितीन फळदेसाई यांनी केली आहे.
वर्षानुवर्षे नववाडे, वाडे आणि वास्को परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन याच तलावात होत आले. मात्र यंदा तलावाची अक्षरशः दुर्दशा झाल्याने गणेश विसर्जनाची परंपरा खंडित झाली. वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा अचानक का थांबली? तलावाची अशी अवस्था कोणी केली? आणि याच काळात खासगी संस्थेला तलावाचा ताबा देण्याची चर्चा का सुरू झाली? असे थेट सवाल फळदेसाई यांनी उपस्थित केले.
खासगी संस्थांच्या संभाव्य हितसंबंधांसाठी सार्वजनिक तलावाचा वापर केला जाणार आहे का? हा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. जनतेच्या पैशातून तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असताना त्यावर खासगी संस्थेचा ताबा देण्याची गरज काय? या निर्णयातून कोणाला आणि काय फायदा होणार आहे, हे सरकारने स्पष्ट करावे.
धार्मिक परंपरा आणि सार्वजनिक वापर सुरक्षित राहण्याची लेखी हमी सरकार देणार का? असा सवाल फळदेसाई यांनी केला. तसेच हिंदू समाजाच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करणारे स्थानिक आमदार या प्रश्नावर कुठे आहेत? गणेश विसर्जनाची परंपरा खंडित झाली असताना त्यांचे मौन का? हिंदूंच्या धार्मिक परंपरेचा प्रश्न असताना ते जनतेच्या बाजूने स्पष्टपणे उभे राहणार की नाही, हे त्यांनी जाहीर करावे, असे फळदेसाई म्हणाले.
वाडे तलाव हा जनतेच्या वापराचा जलस्रोत आहे; कोणाच्या खासगी हितसंबंधांची मालमत्ता नाही. खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा कोणताही डाव असेल तर तो जनतेसमोर उघड झाला पाहिजे. सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि तलाव मुरगाव पालिकेच्या ताब्यात द्यावा; अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आवाज उठावा लागेल, असा इशारा फळदेसाई यांनी दिला.