वणी : शहरातील वृंदावन नगर परिसरात मंडप काढत असताना उच्चदाब विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने एका तरुण मंडप व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृपा हॉस्पिटल परिसरात राहणारे नंदलाल गावित यांच्या मुलाचा विवाह सोहळा नुकताच पार पडला होता. विवाहासाठी उभारण्यात आलेला मंडप काढण्यासाठी शिवरे येथील मंडप व्यावसायिक ऋषीकेश कैलास मत्सागर (वय २७ वर्षे) हा शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी गेला होता. मंडप काढण्याचे काम सुरू असताना लोखंडी पाईप वरून गेलेल्या ११ केव्ही उच्चदाब विजवाहिनीच्या संपर्कात आला. यामुळे ऋषीकेश याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. स्था
निकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला मात्र त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर शिवरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने वणी पोलिस ठाण्यात दाखल झाले. “महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा तरुण बळी गेला,” असा आरोप ग्रामस्थांनी केला. घटनास्थळी उच्चदाब वाहिन्या अत्यंत कमी उंचीवर असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता धनराज ठेपणे यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. वृंदावन नगर परिसरातून गेलेल्या उच्चदाब विजवाहिन्या अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. “अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता किती लोकांचे बळी गेल्यावर अधिकारी जागे होणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
या वेळी शिवसेना (उबाठा) तालुका अध्यक्ष विलास भवर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांत्रिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवून चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.