नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र आणि राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची सत्ता असली तरी, महापालिका निवडणुकांच्यावेळी मात्र महायुतीत असमन्वय होता, अशी कबुली देताना राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका शिवसेना महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी केली.
महापालिका निवडणुकांमधील असमन्वयाची जिल्हा परिषद निवडणुकांत पुनरावृत्ती होऊ नये, साठी महायुतीच्या समन्वय समितीकडून दक्षता घेतली जात असल्याचे नमूद करताना मंगळवारी (दि.५) यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.६) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यातील निवडणुकांमध्ये समन्वय साधण्यासाठी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या मंत्र्यांची समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
या समितीत मंत्री उदय सामंत, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन यांचा समावेश आहे. बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय झाल्याचे सामंत यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीवेळी महायुतीत समन्वय नव्हता का, या प्रश्नावर नाही अशी कबुली देताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत मात्र याची पुनरावृत्ती होणार नसल्याचे सामंत म्हणाले.
महायुतीमधील सर्व पक्षांना स्वपक्षाचा विस्तार वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही एकदिलाने निवडणुकांना सामोरे जाऊ. पक्षात गटबाजी नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. गटबाजी करणाऱ्यांना पक्षाची प्रतिमा मलिन केल्यास त्यांची जागा दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.
हिंदी परीक्षा सक्तीवर सावध भूमिका
केंद्राने राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदी परीक्षा अनिवार्य केल्याने महाराष्ट्रात राजकीय वादंग माजले आहे. यासंदर्भात विचारले असता सामंत यांनी सावध भूमिका घेतली. यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगताना यावर माहिती घेऊन भाष्य करू, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, यात काहीही वावगे नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
एमआयडीसीमार्फत करसंकलन
मनपा हद्दीतील एमआयडीसी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तेथील करसंकलनाचे अधिकार एमआयडीसीकडे घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सामंत यांनी सांगितले. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे संवेदनशील नेतृत्व असल्यामुळेच त्यांनी रुग्णालयात जाऊन उबाठा खासदार संजय पाटील यांच्या पत्नीची विचारपूस केली, असे स्पष्ट करताना आऑपरेशन टायगरचा सामंत यांनी इन्कार केला.
महिंद्रा प्रकल्प नाशिकमध्येच होणार
इगतपुरीतील आडवण येथील महिंद्रा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असला तरी हा प्रकल्प नाशिकमध्येच राहावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा सामंत यांनी केला. या प्रकल्पातून नाशिकमध्ये १५ हजार अतिरिक्त रोजगार निर्माण होईल, असे सांगताना शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधील उद्योग संघटनांनीही शेतकऱ्यांची समजूत काढावी, असे आवाहन त्यांनी केले.