सिडको : अंबड व सातपूर परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास सोमवार (दि. १८) पासून सातपूर येथील एमआयडीसी कार्यालयासमोर सर्व शेतकरी कुटुंबीयांसह तसेच शेती अवजारांसह ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी शिष्टमंडळाला दिले.
प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. निवेदनात, गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी एमआयडीसी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. १९७३ साली जमिनी संपादित करूनही त्यानंतर एमआयडीसीकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मागील मनपा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे शेतकरी संतप्त असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सात-आठ गावांतील प्रकल्पग्रस्त व बाधित शेतकऱ्यांचे डोंगराळ, जंगल भागात किंवा पाण्याअभावी असलेल्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास सोमवार १८ मेपासून सातपूर येथील एमआयडीसी कार्यालयासमोर सर्व शेतकरी कुटुंबीयांसह तसेच शेती अवजारांसह ठिया आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.